‘सलमान’ला लगाम.. ‘दबंग’ बेलगाम!-- घोड्याला टाच पाहुण्यांना जाच

By Admin | Updated: January 2, 2015 00:13 IST2015-01-01T21:55:52+5:302015-01-02T00:13:46+5:30

घोडेवाल्यांची अरेरावी : महाबळेश्वर-पाचगणीच्या पर्यटन व्यवसायात मिठाचा खडा

'Salman' rein 'Dabang' Belgaum! - Watch the knight assassins | ‘सलमान’ला लगाम.. ‘दबंग’ बेलगाम!-- घोड्याला टाच पाहुण्यांना जाच

‘सलमान’ला लगाम.. ‘दबंग’ बेलगाम!-- घोड्याला टाच पाहुण्यांना जाच

सातारा : चुलबुल पांडे, सलमान, कटरिना, टारझन, बेताब, सूरज... एवढंच काय ‘व्हॉट्स-अ‍ॅप’सुद्धा! ही आहेत महाबळेश्वरातल्या घोड्यांची नावं. त्यांचा लगाम मालकाच्या किंवा कामगाराच्या हाती... पण लगाम हाती घेणारा ‘दबंग’ मात्र बेलगाम, अशी सध्या स्थिती आहे. केट्स पॉइंटवर घोडेवाल्यांकडून मारहाण झाल्याची तक्रार पर्यटकांनी केल्यावर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.महाबळेश्वर-पाचगणीत घोडेवाले आणि घोडागाडीवाले सतत चर्चेत असतात. पाचगणीत टेबल लँडवरून दरीत पडलेल्या घोडागाडीने दोन मुलींचा बळी घेतला होता. घोडेवाले आणि पोलिसांमध्ये खडाजंगीही झाली होती. त्यानंतर महाबळेश्वरच्या केट््स पॉइंटवरील घटनेमुळं पर्यटकांच्या या आवडत्या पर्यटनस्थळांना डाग लागतो की काय, अशी साधार भीती निर्माण झाली आहे. केट््स पॉइंटवर घडलेल्या घटनेनंतर वन विभागाने भूमिका स्पष्ट केली आणि या विभागाच्या कोणत्याही पॉइंटवर घोडेवाल्यांना मुळात परवानगीच नाही, असं सांगितलं. महाबळेश्वरातील केट््स पॉइंट, मुंबई पॉइंट, आॅर्थरसीट पॉइंट, सावित्री पॉइंट यांसह अनेक पॉइंट्स वनविभागाच्या ताब्यात आहेत.
काही ठिकाणी घोडे जाऊ नयेत म्हणून लोखंडी नळ्यांचे अडथळेही केले आहेत. तथापि, असं केल्यामुळं आपल्या पोटावर पाय आल्याची घोडेवाल्यांची भावना आहे.
वेण्णा लेक परिसर गिरिस्थान पालिकेच्या अखत्यारीत आहे. येथे सर्वाधिक म्हणजे साठ ते सत्तर घोडेवाले व्यवसाय करतात. पर्यटकांना खास घोडसवारी करण्यासाठी वापरण्यात येणारं पोलो ग्राउंड मात्र वन विभागाच्या अखत्यारीत आहे. केट््स पॉइंटवर चार ते पाच घोडेवाले नेहमी दिसतात, तर मुंबई पॉइंटवर सायंकाळच्या वेळी पंचवीसहून अधिक घोडेवाले असतात. अर्थातच, पर्यटकांशी आणि स्थानिकांशी घोडेवाल्यांचे मतभेद होण्याच्या घटना वारंवार घडतच असतात.
शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावरून घोडेवाल्यांची ‘सवारी’ अनेकदा वादांना निमंत्रण देते. पालिकेने बसस्थानकानजीक असलेल्या टॅक्सी स्टँडजवळ खास ‘पोनी स्टँड’ तयार करून घोडे उभे करण्यासाठी जागा दिली आहे. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी बाजारपेठेतून घोडा जाताना धक्का लागल्याच्या, गाडीला घासल्याच्या कारणावरून बाचाबाची होते. याखेरीज घोड्याची लीद, दुर्गंधी, धूळ अशा अनेक कारणे वादांमागे असतात. त्यामुळे मात्र, पर्यटन व्यवसायाला खीळ बसते. (प्रतिनिधी)



का होतात वाद...
सत्तर टक्के घोडे मालकांच्या नव्हे, तर कामगारांच्या हाती असतात. बहुतांश कामगार परप्रांतीय असून, पर्यटकांशी मालकांइतके सौजन्याचे वर्तन कामगार करीत नाहीत.
बाजारपेठेतून कामगार घोड्यावर बसून जातात. त्यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून पर्यटकांशी बाचाबाची होऊन कधी-कधी प्रकरण हमरीतुमरीवर येते.
पर्यटक घोडसवारीच्या दराची चौकशी अनेकांकडे करतात. चौकशी एकाकडे केली आणि दुसऱ्याचा घोडा घेतला, या कारणावरून अनेकदा भांडणे झाली आहेत.
सनसेट पॉइंटकडे (मुंबई पॉइंट) सायंकाळी चाळीसेक घोडे जातात. घोड्याने लीद टाकली तर एका ठिकाणी न थांबल्याने रस्त्यावर सर्वत्र घाण होते आणि वाद होतात.
जाण्या-येण्याच्या रस्त्यावर घोडा असल्यास तो बाजूला घेण्यास पर्यटकाने सांगितली तर काहीजण अरेरावी करतात आणि त्यातून वाद उफाळतात.

घोड्याला टाच
पाहुण्यांना जाच

Web Title: 'Salman' rein 'Dabang' Belgaum! - Watch the knight assassins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.