सज्जनगड कड्याला कधी होणार ‘रेलिंग’?
By Admin | Updated: June 17, 2014 00:45 IST2014-06-17T00:32:40+5:302014-06-17T00:45:13+5:30
आतापर्यंत आठ बळी : दोन्ही संस्थांनी लक्ष घालण्याची भाविकांची मागणी

सज्जनगड कड्याला कधी होणार ‘रेलिंग’?
परळी : राज्यभरात तीर्थक्षेत्र म्हणून सज्जनगड प्रसिद्ध आहे. विविध भागांतून भाविक, तसेच पर्यटक वर्षभर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. मात्र, गडाच्या चारही बाजूंना कंपाउंड नसल्यामुळे धोका निर्माण झाला असून आतापर्यंत विविध कारणांनी आठ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर काहीजण पाय घसरून पडल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कड्याला रेलिंग कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सज्जनगडावर भाविक, पर्यटकांसाठी समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ यांच्या माध्यमातून महाप्रसाद, राहण्याची, नाष्ट्याची सोय व इतर सुविधा दिल्या जातात. परंतु गडाच्या चारही बाजूस कंपाउंड घालण्यात आले नाही. सज्जनगडला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून त्याच्या विकासासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही वेळ ओढवली असल्याचे बोलले जात आहे.
गडाच्या मागील बाजूस ढाब्याचा मारुतीचे मंदिर आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तोही वैयक्तिक करण्यात आला आहे. शासन व दोन्ही संस्थांनी त्याला मदत केली नाही. या मंदिराशेजारील बाजूनेच आतापर्यंत चार आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सातारा येथील चिमणपुरातील तरुणाचा पाय घसरून तो पडला. त्यावेळी बांबूचे कंपाउंड केले होते; पण तात्पुरते. पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो.
मंदिर परिसरातून ठोसेघरच्या डोंगररांगा, उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी येथे गर्दी होते. त्यावेळी संकट ओढवू शकते. (वार्ताहर)