छडी लागे छम छम... सुगंध येई घम घम!
By Admin | Updated: November 17, 2015 00:01 IST2015-11-16T23:14:36+5:302015-11-17T00:01:43+5:30
देऊरच्या शिक्षकाचे वृक्षपे्रम : विद्यार्थ्याने भेट दिलेल्या छडीतून फुलवले कणेरीचे फूलझाड -- गूड न्यूज

छडी लागे छम छम... सुगंध येई घम घम!
संजय कदम -- वाठार स्टेशन ‘छडी लागे छमछम..विद्या येई घमघम’ असं महात्म्य असलेल्या छडीचा प्रसाद शालेय जीवनात प्रत्येकानेच खाल्ला असेल. आता अभ्यास वदवून घेणाऱ्या या छडीवर बंधने आली असून शिक्षकाच्या हातात दिसणारी छडीही गायब झाली आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षकाला भेट म्हणून दिलेल्या छडीतून एका सुंदर फूलझाडाची निर्मिती करण्याची घटना ही निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.
देऊर येथील एक वृक्षमित्र शिक्षक प्रकाश कदम हे वृक्षारोपणाला चालना देत आहेत. झाडांविषयी त्यांना आपुलकी आहे. म्हणूनच गावात, गावाबाहेर मागेल त्याला ते स्वखर्चातून रोपे देतात.
शिक्षकाने सांगितलेला अभ्यास पूर्ण न करणारी मुले विद्यालयात शिक्षा घेण्यास घाबरतात. त्यांचेच वर्गमित्र सर्वांना छडीचा प्रसाद देण्यासाठी एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या वनस्पतींची काठी छडी म्हणून शिक्षकांना आणून देतात. असेच काम दोन वर्षांपूर्वी स्वप्नील माने या विद्यार्थ्याने सातवीत शिक्षण घेत असताना केले. त्याने प्रकाश कदम सरांना एक छान गुळगुळीत कणेरी या वनस्पतींची काठी छडी म्हणून भेट दिली. तसे पाहिले तर आता छडीचा वापर करण्यावरच बंधने आली आहेत. मात्र तरीही कदम यांनी ती काठी आनंदाने स्वीकारली. छडीने विद्या येईल की नाही, माहीत नाही पण या छडीतून सुगंध मात्र येऊ शकतो, हे त्यांनी ओळखले. त्यांनी काठीचे दोन भाग करुन घरातील कुंडीत माती भरुन या काठ्या रोवल्या. निसर्गनियमाप्रमाणे या काठ्यांना अंकुर फुटले. आता त्याचे सुंदर झाडात रूपांतर झाले आहे.
ज्या मुलाने ही छडी प्रकाश कदम यांना भेट म्हणून दिली, तो मुलगा आता नववीत शिकत आहे. त्यालाही या छडीचे पुढे काय झाले, याची कल्पनाही नव्हती. परंतु प्रकाश कदम यांनी या मुलास या सुंदर फुलांच्या झाडाजवळ उभे करुन त्याने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या छडीची त्याला आठवण करुन दिली. विद्यार्थ्याच्या अनोख्या भेटीमुळे त्याचे कौतुक करून भेटवस्तू देऊन या मुलाचा सन्मान केला.
बहरलेल्या कणेरीने गैरसमज केले दूर
कदम यांनी घरातील कुंडीत लावलेल्या कणेरीचे रोप तयार झाले; परंतु कणेरी या वनस्पतीबाबत लोकामध्ये असलेल्या गैरसमजामुळे याचे वृक्षारोपण करण्यास गावात कुणीच पुढाकार घेत नव्हते. अखेर या रोपाचे पालकत्व गावातील प्रकाश मारुती कदम यांनी स्वीकारले. आज हे झाड फुलांनी गजबजून गेले आहे. रस्त्याने जाणारे अनेक वाटसरु या झाडाची फुले देवासाठी घेऊन जातात.