जलपर्णीने अडविला कृष्णामाईचा मार्ग
By Admin | Updated: February 25, 2016 01:14 IST2016-02-25T01:13:42+5:302016-02-25T01:14:11+5:30
वाईतील चित्र : नदीपात्रात गटाराचे पाणी अन् कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांमधून स्वच्छतेची मागणी

जलपर्णीने अडविला कृष्णामाईचा मार्ग
वाई : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून, संथ वाहणारी कृष्णामाई आता अनेक समस्यांनी थांबते काय? याची भीती व दु:ख नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील दूषित पाण्यामुळे तिला गटारगंगेचे स्वरूप आले आहे.
यावर्षीचे अत्यंत कमी पर्जन्यमान, वाढते उष्णतापमान तिरावरील अनेक गावे व शहर यांची पिण्याची व शेतीसाठी वाढती मागणी यामुळे कृष्णा नदीच्या वाहणाऱ्या पाण्याची पातळी फारच कमी झाली आहे. वाई शहरातून वाहताना तिच्या पात्रात शहरातील दूषित पाणी मिसळत आहे. तर पाण्याचा प्रवाह वाहत नसल्याने नदीपात्रात अनेक ठिकाणी वारंवार निर्माण होणाऱ्या जल वनस्पती मानवनिर्मित कचरा यामुळे तिला ‘गटार गंगेचे’ स्वरूप आले आहे.
पुरातन काळात कृष्णा नदीचे वैभव मोठे होते. अनेक गीतांमधून तिचा उल्लेख संथ वाहते कृष्णामाई असा व्हायचा. परंतु धोम धरण झाल्यानंतर उन्हाळ्यात तिच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी वाहतो. जागोजागी जलचर वनस्पती मानवनिर्मित कचरा यामुळे तिचे पाणी दूषित झाले आहे.
कृष्णा नदीपात्रात काही ठिकाणी बांध घालून बंधारे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असून, पाणी साठा कायमच राहून त्यामुळे पाण्याचा प्रवाह चालू राहील. तसेच शहरातील दूषित पाणी याचे नियोजन करून पात्रातील पाणी स्वच्छ राहील याची काळजी प्रशासन आणि जनतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाबळेश्वरात उगम पावलेल्या कृष्णा नदीचा उल्लेख पुरातन काळापासून केला जातो. या नदीला इतर कमडलू, कुडाळी कोयना, वेण्णा अशा अनेक नद्या येऊन मिळाल्या. परंतु समुद्राला मिळेपर्यंत कृष्णेचे नाव मात्र कायम राहिले आहे. तिच्या तिरावर अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे वसली आहेत. तिच्या यात्रा व उत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो. (प्रतिनिधी)