मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आज ठरणार ‘कऱ्हाड दक्षिण’ची दिशा
By Admin | Updated: July 12, 2014 23:47 IST2014-07-12T23:47:47+5:302014-07-12T23:47:54+5:30
जखिणवाडी, कऱ्हाडात अनेक बैठका : कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आज ठरणार ‘कऱ्हाड दक्षिण’ची दिशा
कऱ्हाड : आगामी विधानसभा निवडणुकीची गणगौळण राज्यभर सुरू झाली आहे. कऱ्हाड दक्षिणही त्याला अपवाद नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात अधिकृत उमेदवार कोण, हे आजतरी सांगता येत नाही; पण जखिणवाडी आणि कऱ्हाडात होणाऱ्या बैठकीत रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्र्यांची दिशा आज ठरणार, असे मानले जाते.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनी कऱ्हाडच्याच पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत त्यांनी जिल्ह्यासह कऱ्हाडला छप्पर फाडके निधीही दिला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतचे जनतेमधील प्रेम द्विगुणीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची डळमळीत करण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत दिल्लीत खलबते झाली आणि त्याची अस्वस्थता कऱ्हाडात पसरली. नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता मात्र पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
राज्याच्या राजकारणाचा आजवरचा इतिहास पाहता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या गेल्या. त्यांनी स्वत: विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तोच अलिखित नियम पृथ्वीराज चव्हाण यांनाही लागू होतो. साहजिकच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, असे मानले जाते. मग ते ही निवडणूक लढविणार का? कोणत्या मतदारसंघातून लढविणार? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मात्र, बाबांनी कऱ्हाड दक्षिणेतून लढावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली दिसत नाही.
दिवंगत प्रेमलाताई चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी बाबा कऱ्हाड दौऱ्यावर आले खरे; पण दक्षिणेवर स्वारी करण्याबाबत त्यांनी या दौऱ्यात ‘ब्र’ शब्दही काढला नाही. रविवार, दि. १३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा कऱ्हाड दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर जखिणवाडीत सरपंच अॅड. नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी ११ ते ३ यावेळेत दक्षिणेतील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी मक्का मश्जिदमध्ये इफ्तार पार्टीला हजेरी लावणार आहेत. तर रात्री हॉटेल पंकजला शहरातील विविध व्यापारी असोसिएशन व उद्योजक यांच्याशी चर्चा करून प्रीतीभोजन घेणार आहेत. (प्रतिनिधी)