रस्ताच बनला बाजाराचा तळ, वाहतुकीचा होतोय घोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:41+5:302021-02-07T04:36:41+5:30
खंडाळा : भाजी विक्रेत्यांसाठी खंडाळा शहरात प्रशस्त मंडई असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी बाजार नव्हे तर दैनंदिन मंडईही रस्त्यावरच भरत ...

रस्ताच बनला बाजाराचा तळ, वाहतुकीचा होतोय घोळ !
खंडाळा : भाजी विक्रेत्यांसाठी खंडाळा शहरात प्रशस्त मंडई असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी बाजार नव्हे तर दैनंदिन मंडईही रस्त्यावरच भरत आहे. रस्त्यावरील हा बाजार आता वाहनधारकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवू लागला आहे. त्यामुळे जागेअभावी रस्ताच बाजारतळ बनला असून त्यामुळे वाहतुकीचा मोठा घोळ होत आहे.
इतर शहरांच्या तुलनेत खंडाळ्याची बाजारपेठ सर्वात लहान आहे; परंतु परिसरातील लोकांना एवढेच व्यापारी ठिकाण असल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांची या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी सतत रेलचेल सुरू असते. नागरिकांच्या सेवेसाठी नगरपंचायतीने शहरात छोटेखानी भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे; परंतु जागा अपुरी पडत असल्याने बाजारा दिवशी व इतर वेळी रस्त्यावर निर्धास्तपणे भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. आठवडी बाजारात अनेक विक्रेते छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हा बँकेपर्यंत या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्री करतात. तसेच इतर दिवशीही मंडईत गजबजाट असतो. रस्त्यावर भाजी विक्री केली जात असल्याने शहरातील रस्ते भाजी विक्रेत्यांसाठी आहेत की वाहतुकीसाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मुळातच शहरातील रस्ते अरुंद असल्याने दळणवळणास अडथळा येतो. त्यामुळे रस्त्यावर एसटी बससह इतर वाहनांची वाहतूक बंद राहते. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे.
चौकट..
म्हणे ग्राहकच येत नाही
ग्राहकांना रस्त्यावरून भाजी खरेदी करणे सोयीचे पडते. एका ठिकाणी गाडी लावून मंडईत चालत जाणे व भाजी खरेदी करणे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे अनेकजण येता-जाता भाजी खरेदी करतात. तर बाजाराची व मंडईची जागा बदलल्यास ग्राहक फिरकत नसल्याने धंदा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही, अशी धारणा भाजीविक्रेत्यांची झाली आहे.
चौकट..
या ठिकाणी होऊ शकते व्यवस्था
खंडाळ्यात आठवडी बाजारासाठी बाजार समितीच्या मैदानातही पुनर्वसन होऊ शकते. मात्र त्यासाठी नगरपंचायत आणि बाजार समिती यांचा समन्वय होणे गरजेचे आहे. याबाबतची योग्य रचना करून कार्यवाही व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. ........................................