सदोष मनुष्यवधाबद्दल सक्तमजुरी
By Admin | Updated: August 26, 2015 00:08 IST2015-08-26T00:08:30+5:302015-08-26T00:08:30+5:30
बाचाबाचीतून वार : ‘अन्नभेसळ प्रतिबंधक’च्या कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू

सदोष मनुष्यवधाबद्दल सक्तमजुरी
सातारा : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून चाकूने वार केल्याप्रकरणी आरोपीस सातारा न्यायालयाने सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरविले आणि दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या घटनेत अन्नभेसळ प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. सूरज ऊर्फ पप्पू भीमराव घुले (वय २३, रा. गोडोली, सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १८ जुलै २०१२ रोजी घडलेल्या या घटनेत सुनील उत्तम कणसे (४०, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्नभेसळ प्रतिबंधक विभागात ते कार्यरत होते. घटनेदिवशी कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांबरोबर पुणे-बंगळूर महामार्गावरील एका ढाब्यावर ते जेवायला गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ढाब्यासमोर घुले याच्याशी किरकोळ कारणावरून त्यांची बाचाबाची झाली होती. त्यामुळे चिडून घुले याने कणसे यांना शिवीगाळ करून धारदार चाकूने त्यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले होते. यानंतर तो साथीदारांसह पळून गेला होता.
याप्रकरणी कणसे यांचे मित्र अजित गणपत शिंदे (वय २२, रा. करंजे पेठ) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन निरीक्षक श्रीरंग लंघे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. एस. व्ही. बेगमपुरे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. अॅड. बेगमपुरे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अविनाश पवार, नंदा झांजुर्णे, विकास ढमाळ, जयश्री भोसले, कांचन बेंद्रे, यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
तीन साक्षी महत्त्वपूर्ण
सुनावणीदरम्यान या खटल्यातील फिर्यादीला सरकार पक्षाने फितूर जाहीर केले होते. तथापि, संतोष रामदास फटके, सचिन बुगड आणि रूपेश भिकूलाल निकम या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.