निवृत्ती आली तरी फौजदाराची टोपी दूरच !
By Admin | Updated: November 16, 2015 23:58 IST2015-11-16T21:20:08+5:302015-11-16T23:58:32+5:30
निवड झाली; नियुक्ती नाही : जिल्हा पोलीस दलातील ७६ हवालदारांची व्यथा--लोकमत विशेष

निवृत्ती आली तरी फौजदाराची टोपी दूरच !
दत्ता यादव -- सातारा -खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन फौजदारपदी निवड झालेल्या ७६ हवालदारांना फौजदारांच्या टोपीने दोन वर्षांपासून हुलकावणी दिली आहे. ‘तांत्रिक’ कारणामुळे त्यांना नियुक्ती मिळत नाहीये आणि वाट पाहून-पाहून आता त्यांची काम करण्याची इच्छाही मंदावत चालली आहे. अनेकजण तर निवृत्तीकडे झुकले आहेत.
फौजदार बनणे हे हवालदाराचे स्वप्न असते. फौजदारपदी थेट नियुक्तीबरोबरच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या खात्यांतर्गत परीक्षांमधूनही नियुक्त्या होत असतात. तथापि, थेट नियुक्ती जितकी झटपट मिळते, तितकी झटपट खात्यांतर्गत नियुक्ती मिळत नाही. अशा ‘रखडलेल्या’ हवालदारांची संख्या जिल्हा पोलीस दलात तब्बत ७६ इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्वांनी पोलीस उपनिरीक्षकपदासाठी २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली असून, ते उत्तीर्णही झाले आहेत. निवड झाल्याचे समजताच हवालदारांच्या कुटुंबांत दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र, नंतर दोन दिवाळ्या उलटल्या तरी फौजदाराची टोपी काही डोक्यावर येईना, अशा अवस्थेत आनंद मावळत चालला आहे.
निवड झाल्यानंतर फौजदाराचा पगार मिळावा, अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही; मात्र दोन वर्षे हे ७६ जण हवालदाराच्याच पगारावर काम करीत आहेत. निवड झालेल्यांमध्ये काही जणांची केवळ दीड वर्ष तर काही जणांची चार वर्षे सेवा उरली आहे.या हवालदारांच्या हाती फौजदाराचा दंडा आलेला नाही. ‘निवृत्ती घेतल्यानंतर आॅर्डर येऊन काय उपयोग,’ असा उद्विग्न सवाल हे हवालदार खासगीत उपस्थित करतात. निवड झालेल्या हवालदारांची कोल्हापूर परिक्षेत्रात कोठेही नियुक्ती होऊ शकते. मात्र, रिक्त जागा नसल्याचे सांगून शासनाकडून या हवालदारांची बोळवण केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. काही जण फौजदाराची टोपी घालण्यासाठी महाराष्ट्रात कुठेही काम करायला तयार आहेत.
अधिकारी फुलपगारी, हवालदार अधांतरी
थेट नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पूर्ण पगार मिळू लागतो. मात्र, खात्यांतर्गत निवड झालेल्या पोलिसांना नियुक्तीच नसल्याने वर्षानुवर्षे हवालदाराच्याच पगारावर राबावे लागत आहे. खात्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पोलिसांना जास्त अनुभव असतो. निर्णयप्रक्रिया त्यांच्या हाती आल्यास तपास जलदगतीने होऊ शकतो. असे असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा न घेता त्यांना ताटकळत ठेवले जात आहे.
राज्यात २६०० पदे रिक्त
एकीकडे नियुक्तीसाठी ताटकळणाऱ्या हवालदारांची संख्या वाढत असताना राज्यात पोलीस उपनिरीक्षकांची २६०० पदे रिक्त आहेत. या पदांवर खात्यांतर्गत निवड झालेल्या हवालदारांना संधी दिल्यास अनेक प्रश्न एकाच वेळी सुटू शकतात; मात्र हवालदारांबद्दलची सरकारी अनास्था हे घडू देत नाही.