बंद देवळातून हनुमान मुक्त करा!
By Admin | Updated: August 16, 2015 21:36 IST2015-08-16T21:36:24+5:302015-08-16T21:36:24+5:30
गोवे : ग्रामस्थांची मागणी; नवीन इमारत बांधूनही विद्यालय सोडेना मंदिराचा ताबा

बंद देवळातून हनुमान मुक्त करा!
सातारा : शाळेसाठी मंदिराची इमारत वापरण्याचे प्रकार ठिकठिकाणी आढळतात; मात्र विद्यालयासाठी नवीन इमारत बांधूनही मंदिराचा ताबा सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे हनुमानाला बंद देवळातून मुक्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. गोवे (लिंब, ता. सातारा) येथे त्याबाबतचा श्री हनुमानाच्या नावाने फलकही स्वातंत्र्यदिनी मंदिरासमोरच लावण्यात आला आहे.
शिक्षणसंस्था व ग्रामस्थांच्या परस्परविरोधी दावे-प्रतिदाव्यांच्या प्रकाराने प्रत्यक्ष हनुमानास वेठीस धरण्याचा प्रकार श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी झाला आहे. दि. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेतही हे मंदिर शिक्षण संस्थेकडून काढून घेण्याचा ठराव दोन हजार लोकांच्या सह्यांच्या अर्जाद्वारे करण्यात आला आहे. तरीही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत असल्याने मंदिर बंद राहिले आहे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून होत असल्याने संपूर्ण परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.गोवे गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेची १९६१ मध्ये स्थापना करून श्री कोटेश्वर विद्यालय सुरू करण्यात आले. या विद्यालयासाठी जागा व इमारत नव्हती, त्यासाठी ग्रामस्थांनी मारुती मंदिरातील सभामंडप व इतर असणाऱ्या मोकळ्या खोल्या ज्ञानदानाच्या या चांगल्या कार्यास दिल्या. लोकसहभागातून थोडीफार दुरुस्ती करण्यात आली. त्याच ठिकाणी या विद्यालयाचे वर्ग सुरू झाले.
या शाळेचे संस्थापक सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी संस्थाचालकांनी समिती स्थापन करून विद्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. विद्यालयाच्या इमारतीसाठी आणि शिक्षण संस्थेसाठी दिवंगत गोपाळ बर्वे आणि मनुकाबाई जिजाबा जाधव यांनी स्वखुशीने जमीन दान केले. त्या जमिनीवर जिजाबा अण्णाच्या स्मारकाचे व विद्यालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम करून आज त्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले आहे. मुख्याध्यापक कक्ष, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, कार्यालय, ग्रंथालय अशा सर्व १८ खोल्या उपलब्ध असूनही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक ग्रामस्थांच्या भावना दुखवल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तरीही आम्ही ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करतो, असे संस्थेकडून सांगण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत गोवे येथील ग्रामस्थांनी सांगितले की, सध्या मंदिरातील खोल्यांचा शाळेसाठी वापरच केला जात नाही. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांना मंदिराच्या एका बाजूने छोट्याशा बोळातून आत सोडले जाते. मंदिरातील सभामंडपात भजन, पूजन, प्रवचन कीर्तन, हनुमान जयंती उत्सवासारखे कोणतेही कार्यक्रम घेणे शक्य होत नाही.
कारण या मंदिराच्या सभामंडपातच शालेय बेंच, डेस्क, कपाटे, टेबल फर्निचर व अडगळीचे साहित्य ठेवले आहे. हनुमानाचे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात मिळावे म्हणून तसा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडेही केला आहे, असेही ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांकरवी मंदिराचा ताबा घेऊ...
ग्रामस्थांच्या सामूहिक योगदानातून शैक्षणिक संस्थेच्या वापरासाठी मंदिराचा ताबा दिला होता. या मंदिराचा गैरवापर करण्याचे संस्था संचालकांकडून थांबवले जात नाही. ग्रामस्थांच्या ताब्यात मंदिर मिळावे म्हणून अनेकांना निवेदन दिले आहे. याबाबत कोणत्याही विभागाने कसलीही हालचाल, चौकशी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित विभागाने अथवा शाळेने जर मंदिर मोकळे करून दिले नाही तर आम्ही ते ग्रामस्थांकरवी मोकळे करू व हनुमानास मुक्त करू, असा इशाराही गोवे येथील तरुणांनी यावेळी दिला आहे.
१५ आॅगस्टच्या ग्रामसभेमुळे अचानकपणे ग्रामस्थांनी मंदिराचा विषय घेऊन ठराव करण्याची गरज नव्हती. आम्हास त्याबाबत कसलीही माहिती नव्हती.
-आनंदराव जाधव, अध्यक्ष कोटेश्वर विद्यालय, गोवे