नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

By Admin | Updated: October 30, 2015 23:41 IST2015-10-30T21:22:35+5:302015-10-30T23:41:51+5:30

शेतकऱ्यांत समाधान : कुसूर परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Rehabilitation of damages by forest department | नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारूख परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भुईमुगासह इतर पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. परिणामी वनविभागाकडून तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तारूखसह बामणवाडी, शिबेवाडी, पवारवाडी, वानरवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यावस्त्या पूर्णता: डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. चारी बाजूने घनदाट झाडी झुडपे असल्याने वनक्षेत्र असल्याने या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या शेत जमिनी असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. तर हिंस्त्र वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारली जात आहेत.
रानटी डुकरांकडून भुईमुग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याने वनपाल आर. डी. माळी आणि वनरक्षक बेंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर तत्काळ पाहणी करून पिकांचे पंचनामे केले. हा पंचनामा वरिष्ठांकडे पाठविला. वरिष्ठांनीही दखल घेऊन तत्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्यात आली.
शिवाजी चाळके, सुभद्रा चाळके, आनंदा पाटील, बाबूराव चाळके, अरुण शिबे आणि आनंदा शिंदे, शिंबेवाडी येथील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटी वनविभागाकडून प्रत्येकी २८ हजार १५९ रुपये देण्यात आले.
तसेच तारूख येथील
भगवान शिरतोडे, चंद्रकांत पवार, पवारवाडी आणि रघुनाथ पाटील, शिबेवाडी या शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या त्यांना प्रत्येकी तीन हजार
रुपये नुकसान भरपाई देण्यात
आली. (वार्ताहर)


मदतीपासून शेतकरी अनभिज्ञ
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते हे बहूतांश शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरीही अनेक शेतकरी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. परिणामी, त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागते.
... यांना मिळते भरपाई !
वानर आणि साळींदर या प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून कसलीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मात्र, रानडुक्कर, माकड, हत्ती या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते तसेच हिंस्त्र प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

Web Title: Rehabilitation of damages by forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.