राज्य कोणाचेही असो सत्ता रामराजेंभोवतीच!
By Admin | Updated: May 31, 2016 00:37 IST2016-05-30T21:38:56+5:302016-05-31T00:37:30+5:30
तीस वर्षांचा इतिहास : विधान परिषदेवर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने उत्साह

राज्य कोणाचेही असो सत्ता रामराजेंभोवतीच!
नसीर शिकलगार--फलटण -अपेक्षेप्रमाणे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने तसेच लाल दिवा पुन्हा शाबूत राहिल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रामराजेंना सत्ता असो किंवा नसो लाल दिवा मिळत असल्याने शरद पवारांवरील निष्ठेचे फळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
फलटण तालुका राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. या तालुक्याचे आतापर्यंत दिवंगत मालोजीराजे नाईक-निंबाळकर, दिवंगत हरिभाऊ निंबाळकर, दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, चिमणराव कदम, माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी नेतृत्व करताना आपल्या व्यक्तिमत्व व कार्याद्वारे वेगळा ठसा राज्याच्या व देशाच्या राजकारणात उमठविला आहे. त्यामुळे फलटणचे नाव राजकारणात आदराने घेतले जात आहे. तालुक्यातील मालोजीराजे नाईक-निंबाळकर, चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व विद्यमान जि. प. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना आतापर्यंत लाल दिवा मिळाला असला तरी सर्वाधिक काळ लाल दिव्यात राहण्याचा मान रामराजे नाईक-निंबाळकर यांनाच मिळाला आहे.
लाल दिवा व रामराजे हे एक अतूट समीकरण झाले आहे. १९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर पहिल्यांदा विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळी राज्यात युती शासनाची सत्ता आली. रामराजे अपक्ष असतानाही त्यांना युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून प्रथम लाल दिव्याची संधी दिली. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आली.
मध्यंतरी मतदारसंघ आरक्षित झाल्याने रामराजेंचे काय होणार अशी शंका व्यक्त होत असताना शरद पवारांनी निष्ठावंत रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिलीच पण लाल दिवाही दिला. १९९५ पासून आजपर्यंत रामराजेंभोवती राज्यात कोणाचीही सत्ता असो लाल दिवा फिरतच आहे. आता पुन्हा विधान परिषदेवर शरद पवारांनी रामराजेंना संधी दिल्याने सहा वर्षे तरी आता लाल दिवा जात नसल्याचे चित्र आहे.
निष्ठेचा राष्ट्रवादीकडून सन्मान
सध्या राष्ट्रवादीचे दिग्गज असलेले खुद्द शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांना लाल दिवा नसतानाही शरद पवारांनी रामराजेंना लाल दिवा देऊन सातारा जिल्ह्याचा व निष्ठेचा सन्मान केल्याचे दिसून येत आहे.