भूकंप म्हणून धावले; पण टाकी पाहून हादरले!
By Admin | Updated: June 14, 2016 00:24 IST2016-06-13T21:28:33+5:302016-06-14T00:24:15+5:30
तांबवेत ग्रामस्थांच्या काळजाचा थरकाप : कार, दुचाकींचा झाला ‘फुटबॉल’; ग्रामस्थांनी घेराव घालताच ठेकेदारांची धूम

भूकंप म्हणून धावले; पण टाकी पाहून हादरले!
दीपक पवार - तांबवे ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थ सोमवारी पहाटे गाढ झोपेत असताना जमीन हादरली. अनेकांच्या स्वयंपाक घरातील भांड्यांचा किणकिणाट झाला. भूकंप आल्याच्या शक्यतेने जीव वाचविण्यासाठी ग्रामस्थ घराबाहेरही धावले; पण टोलेजंग पाण्याची टाकी कोसळताना पाहून ग्रामस्थ वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळाले. सकाळी सर्वकाही सुरळीत झालं. मात्र, पहाटेची भीती अनेकांच्या मनातून गेलेली नव्हती.
काळ आला होता; पण वेळ आली नव्हती...
टाकी कोसळण्याची घटना रात्रीची घडल्यामुळे जीवितहानी टळली. दिवसा घडली असती तर जीवितहानी झाली असती. कारण कोयना नदीवर रघुनाथ पाणवठा आहे. येथे सकाळी ७ पासून दुपारी १२ पर्यंत महिला कपडे धुण्यासाठी येतात. तसेच टाकीच्या तीन बाजूला लोकवस्ती व एका बाजूला नदीचा काठ आहे. जर ही टाकी दिवसा कोसळली असती तर जीवितहानी झाली असती.
अविनाश भोसले यांनी भरलेले २८ लाख रुपये
पाणी योजनेसाठी २८ लाख रुपये वर्गणी भरावयाची होती. ही वर्गणी तांबवेचे सुपुत्र उद्योगपती अविनाश भोसले यांनी एकट्याने भरली होती. योजना पूर्ण होण्यात भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, सोमवारी पहाटे ही टाकीच कोसळल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठेकेदार, ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी
घटनेची माहिती मिळताच टाकीचे बांधकाम करणारे शिवरत्न कंन्ट्रक्शनचे ठेकेदार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे हे त्या ठिकाणी आले असता त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी गावातील लोकांमध्ये व ठेकेदारामध्ये हमरीतुमरी झाली. ठेकेदारांनी ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून तेथून लगेच निघून गेले. काही वेळाने तणाव निवळला.
दोन युवकांनी टाकी कोसळताना पाहिली...
टाकीजवळच भगवान पाटील यांचे घर असून, घराच्या स्लॅबवर अक्षय पाटील, दीपक पाटील झोपले होते. त्या दोघांनी टाकी पडताना प्रत्यक्ष पाहिले.
टाकी कोसळत असताना हे दोघेही ओरडतच घराच्या स्लॅबवरून खाली पळाले. रात्री अर्धवट झोपेतून उठून सारा गाव घटनास्थळी जमा झाला होता.
घटनास्थळी जमा झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची माहिती शासकीय अधिकाऱ्यांना दिली. अधिकारीही त्वरित त्याठिकाणी पोहोचले.
दुर्घटनेमुळे महिला ग्रामस्थांना अश्रू अनावर
दुर्घटनेनंतर या भागातील लोक घाबरले आहेत. महिलांची तर बोबडीच वळली आहे. सोमवारी सकाळी अनेकांचे हातपाय थरथरत होते. जीवावरील संकट टळल्यामुळे यावेळी काही महिला ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. दिवसभर या टाकीनजीक लहान मुले खेळत असतात. तसेच महिला व ज्येष्ठ ग्रामस्थांचाही येथे वावर असतो.