रामराजे फलटणमध्ये ‘चेहरा’ बदलणार?
By Admin | Updated: September 17, 2014 22:29 IST2014-09-17T21:34:22+5:302014-09-17T22:29:16+5:30
सर्वांनाच उत्सुकता : दिगंबर आगवणेंसमोर दीपक चव्हाण यांच्याऐवजी दुसरा उमेदवारही शक्य

रामराजे फलटणमध्ये ‘चेहरा’ बदलणार?
नसीर शिकलगार -फलटण -फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की रामराजे नाईक-निंबाळकर ‘चेहरा’ बदलणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. महायुतीतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडून दिगंबर आगवणे यांचे नाव पक्के झाल्याचे समजते. दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध दीपक चव्हाण असणार की आणखी कोण, याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. गेल्या वीस वर्षांपासून रामराजेंनी विरोधकांना या मतदारसंघावर वर्चस्व मिळू दिलेले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील ही काँग्रेसची मंडळी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहिल्याने राष्ट्रवादीने विधानसभा सहज जिंकत युतीचे बाबूराव माने यांचा पराभव केला होता.
मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण यांना स्वत:ची वेगळी छाप पाडण्यात फारसे यश आले नाही. विरोधकांनी ‘रबर स्टॅम्प’ म्हणून त्यांच्यावर सतत टीका केली. ही टीका खोडून काढण्यात दीपक चव्हाण यांना अपयश आले. मागील पंचवार्षिक काळात बरोबर असणारी काँग्रेसची मंडळी यावेळी राष्ट्रवादीबरोबर राहणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांच्या सहकार्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजकीय ताकद वाढविली. दररोज रामराजे विरुद्ध रणजितसिंह असा सामना सुरू आहे. रणजितसिंहांनी आघाडीधर्म पाळणार नसल्याचे जाहीर करताना दिगंबर आगवणे यांना पाठबळ दिले आहे. दिगंबर आगवणे यांनी नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. फलटणची जागा ‘स्वाभिमानी’ला मिळावी यासाठी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार-पाच दिवसांत सर्वच राजकीय पक्षांना फलटण मतदारसंघाचे चित्र स्पष्ट करावे लागेल.
फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे असून, शिवसेनेने तो आम्हाला दिल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व दिगंबर आगवणे करीत असले, तरी शिवसेनेने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी माजी आमदार बाबुराव माने आणि उद्योजक डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत.
यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याने सर्वांनी अस्तित्वाची निवडणूक केली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर पूर्णपणे आगवणेंच्या पाठीशी असताना अद्याप हिंदुुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, प्रल्हादराव साळुंखे-पाटील या काँग्रेसच्या नेतेमंडळींनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तिघेजण एकत्र बसून विधानसभेबाबत निर्णय घेणार असले तरी राष्ट्रवादीला ते साथ देण्याची शक्यता कमी आहे.