ग्रामपंचायती ताब्यात राखण्यास राजे गट उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:32+5:302021-01-08T06:07:32+5:30
फलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुकीमुळे राजकारणातील वातावरण ढवळून निघाले आहे. राजे गट परंपरागत ग्रामपंचायती पुन्हा ताब्यात घेऊन तालुक्यावर ...

ग्रामपंचायती ताब्यात राखण्यास राजे गट उत्सुक
फलटण : फलटण तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुकीमुळे राजकारणातील वातावरण ढवळून निघाले आहे. राजे गट परंपरागत ग्रामपंचायती पुन्हा ताब्यात घेऊन तालुक्यावर पुन्हा वर्चस्व राखण्यास उत्सुक असताना, खासदार गटही आपली ताकद ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
फलटण तालुक्यात ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष १ हजार २७० एवढे उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सांगवी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोन व प्रभाग तीन, विंचुर्णी ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, बोडकेवाडी ग्रामपंचायतीो प्रभाग एक, तीन, कोऱ्हाळेचे प्रभाग दोन, वडगावचा प्रभाग एक, कोरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, जिंतीचे प्रभाग चार, खुंटेत प्रभाग एक, पिराचीवाडीचा प्रभाग तीन, गुणवरे ग्रामपंचायतीचे प्रभाग पाच, आंदरुडचा प्रभाग दोन, मिरढेचा प्रभाग एक, शेरेशिंदेवाडीचा प्रभाग दोन, निरगुडीचे प्रभाग एक, तीन, चार हे बिनविरोध प्रभाग झालेले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने राजे गटाची संख्या जास्त दिसत आहे.
फलटण तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने राजे गटाकडून इच्छुकांची गर्दी होती. अनेक गावांमध्ये राजे गटाअंतर्गतच दोन-तीन पॅनेल पडण्याची शक्यता दिसत होती. या पार्श्वभूमीवर बंडाळी होऊ नये म्हणून रामराजे नाईक-निंबाळकर यांनी इच्छुकांना बोलावून संवाद साधला. पॅनेल उतरविताना नाराजी राहू नये म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे राजे गटांतर्गत होणारी बंडखोरी काही प्रमाणात टळली आहे. त्यांना मानणारे अनेकजण बिनविरोध निवडून आले आहेत.
नाराजांनी विरोधकांकडे जाऊ नये याचीही योग्य ती खबरदारी राजे गटाने घेतली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीत राजे गटाअंतर्गतच दोन पॅनेलही उभे राहिले असले तरी, विरोधकांशी ते अंतर राखून लांब राहिले आहेत.
दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने ग्रामपंचायत लढविण्याचा प्रयत्न चालवला आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतीत त्यांनी उमेदवार दिले आहेत. त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चालविला आहे. तसेच राजे गटाअंतर्गत नाराजांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार गटातून बाहेर पडलेले दिगंबर आगवणे यांनीही काही समर्थकांना अनेक ग्रामपंचायतीत उभे केले आहे, तर काहींना बाहेरून ताकद दिली आहे. स्पष्ट भूमिका जाहीर न करता पडद्यामागून हालचाली वाढविल्या आहेत. ताब्यातील ग्रामपंचायतीत विरोधकांचा शिरकाव होऊ नये म्हणून राजे गटाने लक्ष दिले आहे.
चौकट
महाविकास आघाडी नाहीच
राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांचे एकत्र सरकार असताना, तालुक्यात तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. राष्ट्रवादीअंतर्गत राजे गट सर्व ग्रामपंचायत जागा लढवत आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते रिंगणात आहेत. फलटण तालुक्यात महाविकास आघाडी अस्तित्वात नाही.
चौकट
येथे होणार चुरशीच्या लढती...
फलटण तालुक्यातील कोळकी, निंभोरे, सरडे, पिंपरद, राजाळे, हिंगणगाव, जिंती, पिंपळवाडी, जाधववाडी, सस्तेवाडी, ढवळ, पवारवाडी, गुणवरे, निंबळक, राजुरी या भागात प्रामुख्याने चुरशीच्या लढती होत आहेत.