ट्रॅव्हल्सची चाकं पुन्हा पंक्चर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:47+5:302021-03-22T04:34:47+5:30
सातारा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा या पर्यटनस्थळी चित्रीकरणासाठी पोषक वातावरण असल्याने हे शहर पर्यटन, प्रवासी वाहतुकीच्या ...

ट्रॅव्हल्सची चाकं पुन्हा पंक्चर!
सातारा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा या पर्यटनस्थळी चित्रीकरणासाठी पोषक वातावरण असल्याने हे शहर पर्यटन, प्रवासी वाहतुकीच्या नकाशावर आले आहे. जिल्ह्यातून एस. टी., रेल्वेला मिळतो तेवढाच प्रतिसाद खासगी प्रवासी वाहतुकीलाही मिळत होता. परंतु, कोरोनामुळे सारेच चित्र बदलले. लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अन् ट्रॅव्हल्सची चाकं पुन्हा पंक्चर झाली.
साताऱ्यातून पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाड्यासह बंगलोर आदी शहरांमध्ये खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. दिवाळी, गौरी-गणपतीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशावेळी सातारकरांना खासगी प्रवासी वाहतुकीचा मोठा आधार मिळतो. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे असंख्य बेरोजगार तरुणांनी बँकांमधून कर्ज काढून वाहने खरेदी केली. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद झाली. त्यामुळे सात-आठ महिने हा व्यवसाय बंद होता. दिवाळीनंतर तो सुरू झाला. सर्व व्यवस्थित होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. विदर्भ, मराठवाड्यासह मुंबईत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी प्रवास करणे बंद केले आहे तर कर्नाटक सरकारनेही निर्बंध घातले आहेत. याचा फटका खासगी प्रवासी वाहतुकीला बसत आहे.
चौकट :
५०
कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या
१२
सध्याची संख्या
कर्नाटकने प्रवेशावर निर्बंध लादले
कमी अंतरातील प्रवासासाठी शक्यतो एस. टी. किंवा स्वत:कडील वाहनाचा वापर केला जातो. मात्र, लांब अंतरातील प्रवास कमी त्रासाचा व्हावा म्हणून खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला जातो. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कर्नाटकसह शेजारील अन्य राज्यांनी प्रवेशावर निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका खासगी प्रवासी वाहतुकीला बसत आहे.
कोट १
शासकीय नोकर भरतीसाठी अनेकदा प्रयत्न करुनही यश मिळाले नाही. त्यामुळे कर्ज काढून गाडी खरेदी केली. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच लॉकडाऊन लागले. त्यामुळे कितीतरी महिने गाडी दारात उभी होती. आता पुन्हा प्रवासी वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अडचणीत भरच पडणार आहे.
- दत्ता माने,
व्यावसायिक.
मुंबईला जाण्यासाठी एस. टी.ने वेळ लागतो. शिवशाही सुरू झाली पण दर जास्त असल्याने खासगी प्रवासी बसमुळे कमी खर्चात जाता येत होते. पण कोरोनानंतर या बस बंद झाल्या अन् आता त्यांची संख्याही कमी झाल्याने गैरसोय होत आहे.
- प्रशांत शरणार्थी, प्रवासी.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात खासगी प्रवासी वाहतुकीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे. प्रवासी कर, विम्याच्या हप्त्यात सवलत देण्याची गरज आहे.
- प्रकाश गवळी,
संचालक, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली.