चाकोरी सोडलेल्यांना जनताच जागा दाखवते

By Admin | Updated: November 25, 2015 00:34 IST2015-11-25T00:17:28+5:302015-11-25T00:34:38+5:30

शरद पवार : आष्टा नगरपरिषदेच्या काकासाहेब शिंदे भाजी मार्केट, मच्छी मार्केटचे उद्घाटन

The public displays the space for those who have left the chakori | चाकोरी सोडलेल्यांना जनताच जागा दाखवते

चाकोरी सोडलेल्यांना जनताच जागा दाखवते

आष्टा : लोकांचा चिरकाल पाठिंबा गृहित धरू नका. चाकोरी सोडून गेल्यानंतर लोक नेत्यांना त्यांची जागा दाखवितात. लोकशाहीत जे सत्ता देतात, तेच सत्ता काढून घेतात. बांग्लादेश युद्धानंतर इंदिरा गांधींच्या कॉँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला; मात्र आणीबाणीनंतर त्याच जनतेने त्यांचा पराभव केला, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथे आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सव सांगता समारंभानिमित्त पहिले थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे भाजी मार्केट व अद्ययावत मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. प्रभाकर घार्गे, आ. जयंतराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. सुमनताई पाटील. आ. मानसिंगभाऊ नाईक, माजी आ. विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जि. प. अध्यक्ष रेश्माक्का होर्तीकर, इलियास नायकवडी, अरूण लाड, विजय सगरे, विश्वासराव पाटील, उपनगराध्यक्षा सुनीता वारे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ऊस कारखादारीत केंद्राचे धोरण अडचणीचे ठरत आहे. साखरेचा दर २४१० पर्यंत खाली आला आहे. दिवाळीतही दर खाली घसरले. देशाला कर्तृत्ववान नेतृत्व लाभले तरी, साखर उद्योगाबाबत देशाची नीती ठीक नसल्याने साखरेचे दर घसरले आहेत. त्याची झळ शेतकऱ्यांना बसत आहे.
हे चित्र बदलण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. निर्मितीची नवीन साधने तयार केली पाहिजेत. विलासराव शिंदे यांनी एकहाती सत्ता मिळवून शहरात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत क रीत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम होत आहे. त्याचा २ वर्षात परिणाम दिसेल. ५० वर्षांचा विकास करण्याच्या दूरदृष्टीचा अभाव जाणवत आहे. जिल्हा, राज्य, देश बदलण्यासाठी शेतीबरोबरच शिक्षण व अन्य क्षेत्रात कर्तृत्व दाखविणारी पिढी निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. आ. जयंतराव पाटील म्हणाले, आष्टा पालिकेने राज्यातील सर्व विकास योजना राबविल्या आहेत. ‘आदर्श शहर’ म्हणून आष्टा नावारूपाला आले आहे.
पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी आता शासनाने प्रयत्न करावेत.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, आष्टा पालिकेने १६१ वर्षात उत्कृष्टपणे काम केले आहे. विकास मंदिर त्यांनी उभारले आहे. डांगे शिक्षण संकुल आष्ट्याच्या वैभवात भर घालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विलासराव शिंदे म्हणाले की, आष्टा शहर लवकरच राज्यातील पहिले शौचालययुक्त शहर होईल. आष्टा नगरपालिकेला चांगला निधी मिळाला आहे. यावरुन यापुढेही विकास करण्यात येईल.
मंगलादेवी शिंदे म्हणाल्या की, खा. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. ते विधानसभा, विधानपरिषदेतही मिळावे.
मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, झुंझारराव शिंदे, सौ. रंजना शेळके, सौ. झिनत आत्तार, सुखदेव भंडारे, रमेश जन्नर, अरूण, मोटकट्टे, आक्काताई कोळी, सज्जन मोहिते, अभियंता चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
माजी खा. निवेदिता माने, प्रणव चौगले, मयूर धनवडे, विजय मोरे, के. टी. वग्याणी, बाळासाहेब वाडकर, अनिल बोडे, सुनील बोडे, जमिलाबी लतीफ, प्रकाश रुकडे, अर्जुन माने, माणिक शेळके, नंदकुमार बसुगडे, प्रकाश मिरजकर, शेरनवाब देवळे, इंद्रजित चव्हाण, बी. एस. संकपाळ, प्रभाकर जाधव, उदय कुशिरे, सतीश माळी, झुंझारराव पाटील, वैभव शिंदे, अशोक पाटील, शैलेश सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)



सहकार चळवळ टिकवण्याचे आव्हान
पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. राज्यात सहकारी संस्थांना घरघर लागली आहे. सहकार चळवळीत राजकारण शिरले आहे. याचा परिणाम गंभीर होत आहे. सहकार चळवळ टिकवण्याचे मोठे आव्हान आता सर्वासमोर उभे राहिले आहे. ते पेलण्याची आज गरज आहे. सहकार चळवळ टिकलीतरच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे.

Web Title: The public displays the space for those who have left the chakori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.