चांगल्या कांद्याला ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:35+5:302021-02-05T09:09:35+5:30
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर ...

चांगल्या कांद्याला ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगलीच होत असून रविवारी भावही वाढला. चांगल्या कांद्याला ३२०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. तसेच कमी दर्जाच्या कांद्यालाही उठाव होता. तर कोबी अन् टोमॅटोला अजूनही भाव कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्याची एकूण ५६० क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४८ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २५०० ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आला. तर यावेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. त्याचबरोबर या रविवारी फ्लॉवरचा भाव वाढल्याचे दिसून आले. फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला.
बोराची आवक कमी...
साताऱ्यातील बाजारपेठेत बोरांची आवक कमी झाली. तर सफरचंद, केळी यांची आवक चांगली आहे. त्याचबरोबर दरात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून आले.
खाद्यतेलाच्या दरात वाढ...
काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, सध्या डब्यामागे तेलाचा दर सरासरी १०० रुपयांनी वाढला आहे. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यंत आहे. एक किलो पाऊचचा दर मात्र स्थिर आहे.
आले स्वस्तच...
सातारा बाजार समितीत अद्यापही अनेक भाज्यांचे दर कमीच आहेत. कारली अन् दोडक्याला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. तर मिरचीला १० किलोस ३०० ते ४०० रुपये, भेंडी २५० ते २००, शेवगा अन् पावट्याला ३०० ते ४०० रुपये भाव आला. तर आल्याला क्विंटलला १८०० पर्यंत दर मिळाला.
मंडईत काही फळभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तर पालेभाज्या अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. लसूण आणि कांद्याचा दर अजूनही स्थिर आहे.
- राजाराम यादव, ग्राहक
साताऱ्यात वांगी, कोबी, टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे फायद्याच्या गणिताचा मेळ बसेना. मात्र, कांद्याचा दर टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
- रामराव पाटील, शेतकरी
भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. सध्या परदेशात तेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तेल डब्यामागे वाढ झालेली आहे. अजून काही दिवस वाढ अपेक्षित आहे.
- संजय भोईटे, दुकानदार