शेतमालाचा भाव..शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

By Admin | Updated: November 1, 2015 00:04 IST2015-10-31T23:31:42+5:302015-11-01T00:04:13+5:30

आजपासून प्रारंभ : सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचा आधुनिक उपक्रम; घरबसल्या मिळणार संपूर्ण माहिती

The price of the farm | शेतमालाचा भाव..शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

शेतमालाचा भाव..शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

सातारा : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांची आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता रोजच्या रोज ‘एसएमएस’द्वारे बाजारभाव समजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे छ. शाहू फळे व भाजीपाला मार्केट येथे तालुक्यातून, जिल्ह्यातून तसेच आसपासच्या राज्यातून कांदा, बटाटा, लसून, आले, फळे तसेच इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. या सर्व शेतमालाची विक्री दररोज लिलावपद्धतीने होते. त्यामुळे बाजारभाव रोजचे रोज निघतात. बाजारभाव शेतकऱ्यांना त्वरित समजावे म्हणून सातारा बाजार समितीद्वारे १ नोव्हेंबर पासून शेतमालाचे बाजारभावाचे ‘एसएमएस’ संबंधित शेतकऱ्याला पाठविण्याची मोफत सुविधा चालू करणार आहे.
ग्रामीण भागातून आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येताना शेतमालाचा दर काय आहे, हे माहीत नसते, किंवा काही कंपन्या, व्यापारी शेतकऱ्यांकडून बांधावरूनच मालाची खरेदी करून माल घेऊन जातात. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला बाजारभावाचे ज्ञान नसल्याने या बाजारभावाच ‘एसएमएस’मुळे त्याला रोजचे बाजारभाव कळे जातील, परिणामी त्याची फसवणूक होणार नाही.
‘छ. शाहू मार्केटमध्ये रात्री उशिरा शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये शेतकरी निवासमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली जाणार आहे. बाजार समितीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करणार आहे,’असे प्रतिपादन उपसभापती बाबासाहेब घोरपडे यांनी केले. (प्रतिनिधी)
 

शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक द्यावेत..
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मोफत ‘एसएमएस’ सुविधेबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळणार आहे. मात्र, ज्या काही शेतकऱ्यांपर्यंत समितीला प्रत्यक्षपणे पोहोचता आले नाही, अशा शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून नाव, गाव व मोबाईल नंबर द्यावा,’ असे आवाहन सभापती विक्रम पवार यांनी केले आहे.
 

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कष्ट करून पिकविलेले शेती उत्पन्न कित्येकदा कवडीमोल दरात विकले जाते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही ‘एसएमएस’ सुविधा सुरू करत आहे.
-अ‍ॅड. विक्रम पवार,
चेअरमन शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा

Web Title: The price of the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.