कोवळ्या पाठीवर अकाली ओझं
By Admin | Updated: June 12, 2014 00:43 IST2014-06-12T00:43:02+5:302014-06-12T00:43:35+5:30
एकही कारवाई नाही : उपाहारगृह, वीजभट्टी, किराणा दुकानांमध्ये बालकामगार बनले वेठबिगार

कोवळ्या पाठीवर अकाली ओझं
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
पुरोगामी जिल्हा अशी साताऱ्याची ओळख आहे. महिला, बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात जिल्हा कायम अग्रेसर राहिला. त्यासाठी अनेक संस्था-संघटना यासाठी झगडत आहेत. गेल्या वर्षीच जिल्ह्यात ‘चाईल्ड हेल्पलाईन’ सुरू झाली आहे. मात्र, बेकारी-दारिद्र्याचा बट्टा जिल्ह्याला लागला आहे. दोन वेळच्या भाकरीची अनेकांना भ्रांत आहे. यातूनच अनेक चिमुकले जीव मिळेल ते काम करीत आहेत. या बालकामगारांचे पावलोपावली दर्शन घडत असतानाही शासनदरबारी मात्र जिल्हा ‘बालकामगारमुक्त’ असल्याचं अभिमानानं सांगितलं जात आहे. समाजातील वास्तव चित्राचा घेतलेला आढावा...
लोकसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. केंद्रात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, ‘अब... अच्छे दिन आनेवाले है!’ मोदींच्या या विधानानंतर सर्वसामान्यांना हायसे वाटले. या निवडणुकीतही नरेंद्र मोदी हे लहानपणी चहा विकत होते, हाही मुद्दा प्रचारात भलताच गाजला. चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होतो, हे स्वप्नवत असले, तरी बालमजुरी हा समाजाला लागलेला कलंक असून, ते एक दु:स्वप्नच आहे, हेही खरे. याला शहर व जिल्हाही अपवाद नाही.
शहरातील अनेक उपाहारगृहांमध्ये मुले काम करतात. ग्राहकांना चहा-पाणी देणे, आतील रुममध्ये कप-बशी, ग्लास विसळण्याची कामे ती करतात. नेमक्या अशाच हॉटेलमध्ये एक फलक हमखास पाहायला मिळतो... ‘येथे बालकांना काम मिळणार नाही. येथील कामगारांना दररोज पगार दिला जातो...’ अशाच अनेक हॉटेलांत मुलांकडून काम करवून घेतले जाते. महामार्गावरील ढाब्यांमध्येही बालकामगार कार्यरत आहेत.
जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. त्यामुळे वाळू व्यावसायाबरोबरच वीटभट्टीचा व्यवसायही चांगला चालतो. अशा अनेक वीटभट्ट्यांमध्ये बालकामगार काम करत आहेत. यामध्ये माती, पाणी आणणे, चिखल तयार करणे, भाजलेल्या विटा बाजूला आणणे आदी कामे ही मुलं करतात.
वडापाव, भेळ, मिसळचे गाडे, बसस्थानकात बूटपॉलीश करणे, चित्रपटगृहांमध्ये चणे-फुटाणे विकताना बालकामगार दिसतात. या सर्व मुलांकडे समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. अशा मुलांना पाहून अनेकांना वाईटही वाटतं; पण हे थांबविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, हेच दुर्दैव!