प्रवीण पाटलांवर आगपाखड
By Admin | Updated: July 4, 2014 00:26 IST2014-07-04T00:24:37+5:302014-07-04T00:26:03+5:30
पालिका सभा : रवींद्र पवार, दत्ता बनकरांसह जयेंद्र चव्हाण यांनी केले लक्ष्य

प्रवीण पाटलांवर आगपाखड
सातारा : सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या चर्चेत जे मुद्दे मांडायचे ते भर सभेत मांडणाऱ्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्यावर दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी चांगलीच आगपाखड केली. रवींद्र पवारांनी तर त्यांना स्वीकृत नाही तर ‘विकृत नगरसेवक’ असे संबोधून सभेत बॉम्बच टाकला. तुमचा अभ्यास केवळ प्रसिध्दीसाठी न वापरता पालिकेच्या फायद्यासाठी वापरा, असा नमुनेदार सल्लाही जयेंद्र चव्हाण, अॅड. दत्ता बनकर व रवींद्र पवार यांनी पाटील यांना दिला. सभेने माजगावकर माळावर अद्ययावत फिश मार्केटसह ४६ विषयांना मंजुरी दिली.
आचारसंहितेच्या चक्रव्यूहात अडकलेली पालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर गुरुवारी (दि. ३) नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात झाली. पर्यावरण संरक्षण करणाऱ्या हरित इमारतीबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्याच्या विषयाबाबत माहिती देण्यासाठी नगरसेवक प्रवीण पाटील उठले. त्याचवेळी रवींद्र पवार, जयेंद्र चव्हाण व अॅड. दत्ता बनकर यांनी त्यांना विरोध केला. ‘तुम्ही फक्त बोलता, प्रसिद्धीसाठी हे सगळं करताय का? सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या बैठका होतात. त्यामध्येच बरेचसे धोरणात्मक निर्णय होतात. मात्र, तिथे पाटील आपले मत मांडत नाहीत. वास्तविक त्यांनी तिथेच मते व्यक्त करावीत. सभेचा वेळ वाया घालवू नये,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फिश मार्केट बांधण्याच्या विषयाची माहिती देताना पाटील यांनी दहा गुंठ्यांत कोल्ड स्टोअरेजची सुविधा असणारे अद्ययावत फिश मार्केट बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा जयेंद्र चव्हाण यांनी कोल्ड स्टोरेजसाठी किती तरतूद केली आहे? केवळ दिशाभूल करण्यासाठी काहीही माहिती देऊ नका, असे स्पष्ट केले. रवींद्र पवार यांनीही दिवसातले दोन तास पाटील पालिकेत असतात. या कालावधीत ते माहिती घेतात. ते बी.ई. इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा पालिकेला झाला. मात्र, त्यांनी ज्ञानाचा फायदा पालिका प्रशासनाला करून द्यावा. इलेक्ट्रिकल संदर्भातील विषय प्रशासनाने पाटलांना दाखवूनच घ्यावेत, अशी कोपरखळी मारली.
कचराकुंड्या खरेदीसंदर्भात जयेंद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. आपले शहर कचराकुंड्यामुक्त आहे. आता पुन्हा शहरात कुंड्यांची संख्या वाढवून शहराला बकाल केले जाणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावर आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी खुलासा करताना पूर्वीच्या कचरा कुंड्यांच्या दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच पालिकेचा कॉम्पॅक्टर एकावेळी १५ कुंड्यांतील कचरा रोज उचलतो. पूर्वी ९० कुंड्या होत्या. नवीन कुंड्या घेण्यामागे व्यक्तीश: कोणताही हेतू नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. स्थायी समितीनेही याला मंजुरी दिली असल्याचे सांगितल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)