तांबवेत उंडाळकर गटाची सत्ता कायम
By Admin | Updated: November 13, 2015 23:42 IST2015-11-13T22:33:33+5:302015-11-13T23:42:56+5:30
कऱ्हाड तालुका : सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध; पृथ्वीराज चव्हाण गट सत्तेपासून दूर

तांबवेत उंडाळकर गटाची सत्ता कायम
तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवेच्या सरपंचपदी संतोष रामचंद्र कुंभार व उपसरपंचपदी धनंजय रघुनाथ ताटे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला सरपंच व उपसरपंचपद मिळाल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या तांबजाई पॅनेलेला सत्तेपासून दूर राहावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंडितराव पाटील, ग्रामसेवक प्रमोद ठोके यांच्या उपस्थिती निवडप्रक्रिया पार पडली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होते. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे ६ , सहकार पॅनेलचे ५ व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या तांबजाई पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले होते. येथे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व तांबजाई ग्रामविकास पॅनेल यांनी एकत्रित येऊन येथे सत्तास्थापन करण्याचे मनसुबे ठरविले होते. त्याला पूर्णविराम मिळाला. त्या दोन्ही गटांचे मिळून ८ उमेदवार झाल्याने येथे त्यांची सत्ता आली व सहकार पॅनेल सत्तेवरून दूर राहावे लागले त्यांना विरोधी भूमिका बजवावी लागणार.
या निवडीवेळी विजयी उमेदवाराचे निवासराव पाटील, माजी उपसरपंच आनंदा ताटे, माजी मुख्याध्यापक एम. जे. पाटील, अशोक पाटील यांनी कौतुक केले.
सरपंच व उपसरपंच निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व जल्लोष साजरा करण्यात आला.
या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीवेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार विठोबा ऊर्फ आबासाहेब पाटील, धनंजय ताटे, संतोष कुंभार, रूपाली फल्ले, मंगल पाटील, वैशाली पाटील, तांबजाई ग्रामविकास पॅनेलचे जावेद मुल्ला, मंगल पवार व सहकार पॅनेलचे प्रदीप पाटील, सुवर्णा देशमुख, नंदाताई करपे, संपत साठे, नंदाताई साठे हे सर्व उमेदवार उपस्थित होते. येथील सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी होते. ग्रामपंचायत १३ सदस्यांची आहे. (वार्ताहर)
तंग वातावरणात निवडी
येथील सरपंच व उपसरपंच निवडीवेळी सकाळपासून थोडे तंग वातावरण होते. थोडी वादावादी वगळता आजच्या निवडी शांततेत बिनविरोध पार पाडल्या.
नेत्यांची चांगलीच धावपळ
काही नेत्यांची सकाळपासून चांगलीच धावपळ झाली. युवकांनीही एकत्रित येऊन भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या विजयी घोषणा दिल्या. काही नेत्यांनी या निवडीमध्ये आपले काय शिजत नाही म्हटल्यावर पळ काढला. त्यांना आता विचार करण्याची वेळ आली आहे.