तरुण कार्यकर्त्यांना घेऊनच पक्षीय राजकारण !
By Admin | Updated: May 30, 2016 00:41 IST2016-05-29T22:00:29+5:302016-05-30T00:41:24+5:30
खंडाळा नगरपंचायत : राजकीय आखाड्यातील कुस्त्यांसाठी विविध पक्ष लागले तयारीला; वर्चस्व प्रस्थापित करण्याची स्पर्धा सुरू

तरुण कार्यकर्त्यांना घेऊनच पक्षीय राजकारण !
दशरथ ननावरे- खंडाळा -तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे खंडाळा नगरपंचायतीची घोषणा झाल्याने पुढील राजकीय वाटचालीकडे मातब्बरांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडाळा शहरात अनेक सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये तरुणाई उत्साहाने नेहमीच अग्रभागी राहिली आहे. बदलत्या काळानुसार आणि बदलत्या शहरीकरणानुसार राजकारणाकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टिकोनही बदलला आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना प्राधान्याने विचारात घेऊनच पक्षीय राजकारणाची वाटचाल होणार आहे. साहजिक खंडाळा नगरपंचायतीच्या दृष्टीने तरुणांच्या रथावरच पक्षीय राजकारणाचा वारू स्वार होईल, हे निश्चित आहे.
गेले सहा महिने बहुचर्चित असलेल्या खंडाळा नगरपंचायतीची घोषणा गावच्या यात्रेदिवशीच झाली आणि राजकीय यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेतील पैलवानांचा आखाडा संपून राजकीय आखाड्यातील कुस्त्यांसाठी पक्षीय पातळीवरील मल्ल तयारीला लागणार आहेत. खंडाळा शहरात वैयक्तिक राजकारणापेक्षा पक्षीय राजकारणाला नेहमीच उधाण आले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक लढतीबरोबरच अलीकडच्या काळात शिवसेना आणि भाजपाने शहरात केलेला शिरकाव डोळ्याआड करून चालणार नाही.
वास्तविक खंडाळ्यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि इतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून प्रमुख पक्षांनी आपली तरुणांची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी वारंवार तरुण कार्यकर्ते अग्रेसर राहिले आहेत. यामध्ये पक्षातील वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय क्षेत्रात आपले अस्तित्व दिसून यावे आणि हळूहळू वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धाच लागलेली पहायला मिळते; मात्र या सर्वांचा परिणाम प्रमुख पक्षांची ताकद वाढण्यावर झालेली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी खंडाळ्यात आपली पकड नेहमी मजबूत ठेवली आहे. त्यांचाच वारसा पुढे पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांची सक्षमपणे चालवत कार्यकर्त्यांचा संच जोपासला असल्याने काँग्रेसची ताकद आजपर्यंत अबाधित राहिली आहे. शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून तरुणांना नवी संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांची नाळ लोकांशी जोडली गेली आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. शामराव गाढवे यांची नेहमी संघर्षमय कारकीर्द राहिली आहे. दिवंगत बकाजीराव खंडागळे यांच्या मदतीने राष्ट्रवादीची खंडाळ्यात केलेली बांधणी पक्षाची ताकद वाढविणारी ठरली आहे. तरुण कार्यकर्त्यांना नव्या प्रवाहात दिशा देण्यासाठी गजराज मित्र मंडळाच्या माध्यमातून विधायक प्रयत्न फायदेशीर ठरत गेला आहे. राजकीय पटलावर मंडळाच्या वतीने केलेल्या कामाचा ठसा उठावदार राहिला आहे.
खंडाळ्याच्या पहिल्या नगरपंचायतीवर शिरकाव करून शिक्कामोर्तब करण्यासाठी संथगतीने पक्षीय राजकारणाची मोळी बांधली जाणार आहे.
खंडाळ्याचा कायापालट...
खंडाळ्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यामुळे शासनाच्या नगरविकास विभागामार्फत शहरातील नागरी सुविधा व मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. याशिवाय प्रतिवर्षी खास निधीची तरतूद स्वतंत्रपणे करण्यात येते. त्यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे सोपे जाते. याशिवाय शासनाच्या अर्थ, बांधकाम, नगरविकास यासह विविध विभागांमार्फत आवश्यक कामांसाठी पाठपुरावा झाल्यास शहराचा कायापालट होणे सहज शक्य होते. नगरपंचायतीमुळे खंडाळ्यासाठी हे नवे पर्व निर्माण झाले आहे.
कॉँग्रेस, राष्ट्रवादीची जुगलबंदी कायम...
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खंडाळ्यातील जुगलबंदी यापुढेही कायम राहणार असली तरी कट्टर शिवसैनिकांनी शिवसेनेला दिलेली ताकद आणि विरोधकांना कडवा विरोध तसेच भाजपाच्या माध्यमातून अभिजित खंडागळे यांनी अंतर्गत केलेल्या गटाचा विस्तार हा लक्ष्यवेधी ठरणार आहे. प्रभागरचना आणि आरक्षणाच्या सोडतीनंतरच याचा प्रभाव कसा असेल हे दिसून येणार आहे. सध्यातरी नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून पक्षांसह अनेकांनी चाचपणी सुरू केली असून नगरपंचायतीवर सत्ता स्थापणेसाठी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.