राजकीय हालचालींनी सातारा ढवळला
By Admin | Updated: September 26, 2014 23:33 IST2014-09-26T22:44:12+5:302014-09-26T23:33:06+5:30
विधानसभा निवडणूक : प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांमुळे बदलली समीकरणे

राजकीय हालचालींनी सातारा ढवळला
सातारा : राष्ट्रवादीने आघाडीची चर्चा सुरू ठेवतच सातारा जिल्ह्यात मात्र, काँग्रेसला झुलवत ठेवले आणि त्यांचे उमेदवारही निश्चित केले. याचा फटका शुक्रवारी काँग्रेसला बसला आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघात त्यांना उमेदवार निवड करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव वगळता काँग्रेसच्या उमेदवाराबाबत कोणीही अधिकृतपणे सांगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच दिवसभरात पसरलेल्या राजकीय अफवांनी सर्वच पक्षांची राजकीय चिंता वाढतच चालली होती.
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून यापैकी दोनच ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून कोण याची उत्सुकता ताणली आहे. राष्ट्रवादी कार्यालयातून कऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारासाठी एबी फॉर्म पाठवून दिला आहे. मात्र, त्यावर असणाऱ्या रकान्यात नाव नाही. येथून विलासराव पाटील-उंडाळकर पुरस्कृत अथवा राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार आहेत.
शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘सातारा-जावळी’तून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार कोण, याचीच चर्चा दिवसभर होती. येथून रजनी पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे.
पाटणमधून राष्ट्रवादीकडून सत्यजितसिंह पाटणकरच असणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार निश्चित केलेला नाही. मात्र, येथून काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील आणि राहुल चव्हाण यांच्यात रस्सीखेच होती.
कोरेगावातून काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्याविरोधात कोण, याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला आहे. काँग्रेसचा येथील तिढा शुक्रवारी मध्यरात्री अथवा शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुटण्याची शक्यता आहे.
माण मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून जयकुमार गोरे असणार आहेत.
‘कऱ्हाड उत्तर’मधून राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील विरुध्द काँग्रेसचे धैर्यशील कदम अशी लढत होणार आहे.
महायुतीच्या जागावाटपात फलटण मतदारसंघ स्वाभिमानीकडे गेल्याचे स्पष्ट होताच आणि आघाडीचा विचार करता राष्ट्रवादीला पुन्हा जागा मिळणार असल्याचे संकेत मिळताच काँग्रेसकडून इच्छुक असणारे दिगंबर आगवणे यांनी ‘स्वाभिमानी’त प्रवेश केला. मात्र, महायुती फुटली आणि आघाडी तुटल्यामुळे आगवणेंची सर्वात मोठी गोची झाली. त्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत फलटणमध्ये बैठक सुरू होती. त्या बैठकीतच रात्री उशिरा त्यांनी काँग्रेसमध्ये परत येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने येथून दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे उमेदवार
कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण
माण : जयकुमार गोरे
कऱ्हाड उत्तर : धैर्यशील कदम
कोरेगाव : विजयराव कणसे
सातारा : रजनी पवार
वाई : राहुल घाडगे
पाटण : राहुल चव्हाण
फलटण : दिंगबर आगवणे
कोरेगावचा तिढा मुंबईत सुटला
कोरेगाव मतदारसंघात गेले काही दिवस विजयराव कणसे यांनी काँग्रेसकडून तयारी सुरू केली. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे यांनी ‘कोरेगावात विकासकामांसाठी तरणे खोंड हवे, म्हातारा बैल नको’ अशी कणसे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीकेची झोड उठविली आणि स्वत:च लढण्याचे संकेत दिले. येथील उमेदवारी कोणाला द्यायची, या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत चर्चा सुरू होती. यात कणसे यांनी बाजी मारली आणि ते थेट एबी फॉर्म घेऊनच कोरेगावच्या दिशेने रवाना झाले.