सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ नाही तर ‘ऑपरेशन दरोडा’ केले. हे इलेक्शन नसून मिशन होते. यामध्ये पोलिसांकडून आमचा महाबळेश्वरच्या घाटात ‘एन्काऊंटर’ करण्याचा प्रयत्न होता. पोलिस अधिकारीही ऑपरेशन यशस्वी करून येतो म्हणून सांगत होते. यामुळे आमच्या जीवास धोका आहे. यामागे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आहेत, असा थेट गंभीर आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला.सातारा येथे बुधवारी (दि. २५) आयोजित पत्रकार परिषदेत देसाई व मांडवे बोलत होते. देसाई म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीआधीच पोलिस आम्हाला ताब्यात घेऊन गेले. आमचे मोबाइल काढून घेतले. यादरम्यान पोलिस अधिकारी गर्जे हे मिशन फत्ते करून येतो, असे सांगत होते. कायद्याचे रक्षक असणाऱ्या वर्दीतील गुंडांचा वापर हा लोकशाहीची हत्या करण्यासाठी करण्यात आला आहे.कारण, ३० वर्षांत आमच्यावर एकही गंभीर गुन्हा नोंद नाही; पण या निवडणुकीसाठी गुन्हे नोंद केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे हेही पोलिसांत स्वत: हजर झाले. पण त्यांचा जबाबही पोलिसांनी घेतला नाही. त्यांचे सत्य ऐकायला कोणी तयार नव्हते. पाेलिस अधिकारीही संबंधित मंत्री यांना जिल्हा परिषदेचे ऑपरेशन यशस्वी झाले, असे सांगत होते. पोलिसांनी आमच्याबाबत गुन्ह्याचा बनाव केला.
सत्तेसाठी रचलेलं हे षडयंत्र होतं...जिल्हा परिषदेच्या चाैथ्या मजल्यावर २५ ते ३० पोलिसांनी मला पकडून जेरबंद केले. आम्हाला नेल्यानंतर एन्काऊंटरची भीती होती. त्याचवेळी मंत्री मकरंद पाटील यांचा काॅल आला, तेव्हा पोलिस अधिकारी गर्जे यांनी मोबाइल काढून घेतला. ‘त्यांनी गोळ्या घालून मारेन’, असे म्हणत धमकावले. जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा वापर करून रचलेलं हे षडयंत्र होतं. याप्रकरणामागे मंत्री जयकुमार गोरे आहेत, असा आरोप संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत केला.
अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी...जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुन्हा राबवावी. निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी, ही आमची मागणी आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने पोलिस अधिकारी अरुण देवकर यांना नोटीस काढली आहे, अशी माहितीही देसाई आणि मांडवे यांनी दिली.
पत्रकारांना हजर राहू द्या...अध्यक्ष निवडीवेळी पत्रकारांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी हवी होती; पण त्यांना येऊ दिले नाही. हे कटकारस्थान आहे, असा आरोपही देसाई आणि मांडवे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आता ४ एप्रिलला जिल्हा परिषदेतील सभापतीपदांची निवडणूक होत आहे. यावेळी पत्रकारांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : NCP leaders Desai and Mandave accused police of plotting an 'encounter' during Satara ZP elections. They alleged misuse of power and false charges, implicating a minister. Police involvement in the election process is questioned.
Web Summary : एनसीपी नेताओं देसाई और मांडवे ने सतारा ZP चुनावों के दौरान पुलिस पर 'एनकाउंटर' की साजिश रचने का आरोप लगाया। उन्होंने सत्ता के दुरुपयोग और झूठे आरोपों का आरोप लगाया, जिसमें एक मंत्री भी शामिल है। चुनाव प्रक्रिया में पुलिस की भूमिका पर सवाल उठाए गए हैं।