घानवड येथे पाण्यातून २४ जणांना विषबाधा

By Admin | Updated: July 18, 2016 00:49 IST2016-07-18T00:37:30+5:302016-07-18T00:49:01+5:30

प्रशिक्षण केंद्रातील घटना : आरोग्य यंत्रणेला हादरा; सातारा, सांगलीचे प्रशिक्षणार्थी; चाळीसजणांची तपासणी

Poisoning 24 people in water from Ghanwad | घानवड येथे पाण्यातून २४ जणांना विषबाधा

घानवड येथे पाण्यातून २४ जणांना विषबाधा

विटा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घानवड (ता. खानापूर) येथील जाई-जुई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्रातील २४ प्रशिक्षणार्थींना पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
या प्रशिक्षण केंद्रातील सर्व मुला-मुलींची तपासणी करण्यात आल्यानंतर सर्वाधिक त्रास झालेल्या २४ जणांवर विटा ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. विषबाधा झालेले सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सातारा जिल्ह्यातील आहेत. या प्रकाराने आरोग्य यंत्रणेला धक्का बसला असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शासनाच्या या अभियानातून सांगली, सातारा, कोेल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने गरिबांसाठी बचत गट स्थापन करून त्यातील सदस्य किंवा त्यांच्या पाल्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
त्यासाठी घानवड येथील जाई-जुई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने टेक्स्टाईल पार्कजवळ प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या प्रशिक्षण केंद्रात सध्या ७५ मुला-मुलींना कापड शिलाई व संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यांची राहण्याची, भोजनाची सोय त्याठिकाणीच करण्यात आली आहे.
या केंद्राच्या कँटीनमध्ये प्रशिक्षणार्थींची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कँटीनच्या बाहेर एक हजार लिटर पाण्याची टाकी ठेवण्यात आली असून, त्या टाकीत कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. शनिवारी रात्री प्रशिक्षणार्थींनी जेवणानंतर त्या टाकीतील पाणी पिण्यासाठी घेतले. काहींनी ते प्राशन केले. मात्र, रविवार सकाळपासून त्यांना उलटी, जुलाबाचा त्रास होऊ लागला. या घटनेची माहिती मिळताच प्रशिक्षण केंद्रचालकांनी सर्व मुले व मुलींना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रविवारी दुपारी सांगलीचे ग्रामीण विकास यंत्रणा अधीक्षक अजयकुमार माने, सातारा जिल्ह्याचे प्रकल्प संचालक थाडे, सांगलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, सातारचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पारगावकर, खटावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाय. आर. शेख, खानापूरचे आरोग्य अधिकारी डॉ. ए. व्ही. लोखंडे, तालुका समन्वयक एस. एस. बडचे, विटा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह वैद्यकीय पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी विटा ग्रामीण रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या १६, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ८ अशा २४ जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित ४० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)
अनिल बाबर यांच्याकडून विचारपूस...
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींची विचारपूस केली. त्यावेळी आ. बाबर यांनी योग्य व तातडीने उपचार करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी तीन दिवस वैद्यकीय पथक घानवड येथे थांबून विषबाधाग्रस्त प्रशिक्षणार्थींची काळजी घेईल, असे सांगितले. प्रशिक्षण केंद्र संचालक धोंडिराम जाधव यांनी अज्ञाताने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकल्याचा संशय असल्याचे विटा पोलिसांना सांगितले.
घानवड येथील प्रशिक्षण केंद्रातील मुलांसाठी कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. ओढ्याच्या काठावर असलेली ही कूपनलिका चालू व बंद मोबाईलद्वारे होते. तेथून जलवाहिनीने हे पाणी खुल्या टाकीत सोडण्यात आले आहे. त्या जलवाहिनीलाच एक चावी काढून तेथून हे पाणी टाकीत पडते. मात्र, या टाकीत टीसीएल किंवा अन्य जंतूनाशक पावडर टाकली का? याबाबत अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली. तसेच प्रत्यक्ष पाहणी केली असता, प्रशिक्षण केंद्रातील आर. ओ. सिस्टीम गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याचे तेथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कूपनलिकेचे पाणी पिण्यास योग्य की अयोग्य, असा सवाल उपस्थित झाला आहे.
विषबाधित प्रशिक्षणार्थी
निखिल धेंडे (वय १८), जगदीश वायचळ (२०), विजयकुमार पवार (२३, सर्व रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ), विशाल ठोंबरे (१७, रा. कुर्ली, ता. खानापूर), साहील मोमीन (१८), राणी सावंत (३०), राणी बोतलाजी (३२, सर्व रा. कोरेगाव, जि. सातारा), अरिफ मुल्ला (२४, रा. नेवरी, ता. कडेगाव), अश्विनी नामदास (१९), काजल पवार (१९, सर्व रा. आसू, ता. फलटण), सोनाली रेवणे (२२), पूजा रांजणे (१९), सुवर्णा कदम (१९), शकुंतला राजपुरे (२२, सर्व रा. महाबळेश्वर), वर्षा जमले (१८, रा. मुंढे, जि. सातारा), पूजा सावंत (१८), प्रणिता रेवडे (२०, दोघीही रा. पाटण), ऋतुजा आढाव (१९), रूपाली आढाव (१९, दोघीही रा. गुणवरे), पूजा बनसोडे (१९, रा. बस्तवडे), सारिका जाधव (२२, रा. वडोली, ता. कऱ्हाड), पूजा जाधव (१९, रा. आळसंद), पूजा यादव (१८, रा. पाली, जि. सातारा) यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

Web Title: Poisoning 24 people in water from Ghanwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.