जायगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:54+5:302021-03-22T04:34:54+5:30
कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच ...

जायगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा!
कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील रस्त्यांबाबत बांधकाम विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कोरेगाव तालुक्यात मोडत असलेल्या, मात्र कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव परिसरात रस्त्यांचे जाळे शंकरराव जगताप यांनी विणले होते. मात्र, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा होण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य या रस्त्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. जायगाव, कण्हेरखेड, वाघजाईवाडीसह अनेक गावे या रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत. मात्र ऊस वाहतुकीसह अन्य शेतीमालाच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. खासगी वाहतूकदार या परिसरात मालवाहतूक करण्यास स्पष्ट शब्दात नकार देतात.
सह्याद्री व जरंडेश्वर या दोन्ही कारखान्यांचे कार्यक्षेत्र असल्याने आणि परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस वाहतुकीस अडथळा होत असल्याने शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
मध्यंतरीच्या काळात जायगावच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन जायगाव-वाघजाईवाडी-एकंबे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता, त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
एसटीच्या नकाशावरून वाघजाईवाडी गायब
एकंबे आणि जायगावच्या मधोमध वाघजाईवाडी हे गाव आहे. या परिसरात आशा भवन संस्थेचे मतिमंद मुलांचे शैक्षणिक संकुल आहे, या परिसराला भेट देण्यासाठी देशभरातून विविध संस्थांचे प्रतिनिधी येत असतात. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरेगाव एसटी आगाराने जायगावकडे जाणाऱ्या बसेस एकंबेतून कण्हेरखेड मार्गे वळविल्याने वाघजाईवाडी हे गाव एसटीच्या नकाशावरून गायबच झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एसटीने लांबच्या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू केल्याने तिकीट दराबरोबरच वेळेचाही अपव्यय होत आहे. याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.