खड्डे भरून घेण्याची मागणी !
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध: प्रमुख राज्यमार्ग असणाऱ्या वडूज-कऱ्हाड रस्त्यावर गोपूजनजीक असणाऱ्या फरशी पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने पावसात त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. हा खड्डा गेले अनेक दिवस तसाच असल्याने कोण लक्ष देणार आहे की नाही, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.
या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले आहेत. प्रत्येक पावसात त्या खड्ड्याचे आकारमान वाढत असून छोट्या पावसातदेखील ते तळे दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार होती. त्यामुळे डबके भरून वाहत होते. वाहनधारक, शेतकरी यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खटाव तालुक्यातील ऊस येथील तीन कारखान्यासह इतर तालुक्यातील कारखान्याना पुरवठा याच मार्गावरून केला जात आहे. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची सतत वर्दळ आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी नुसते खड्डे भरून मलमपट्टी करून चालणार नाही, कारण रोज धावणारी वाहनसंख्या लक्षात घेता रस्त्याचे दर्जेदार काम होणे आवश्यक आहे.
या मोठ्या खड्ड्याबरोबरच गोपूज ते पळशीपर्यंत अनेक छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचेही काम होणे आवश्यक आहे. फरशी पुलात तर मोठमोठे खड्डे पडल्याने किरकोळ पावसातदेखील रस्ता जलमय होत आहे. पावसाने फरशी पुलावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून या पुलासह रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोटो : वडूज-कऱ्हाड रस्त्यावर गोपूजनजीक असणाऱ्या फरशी पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. (छाया: रशिद शेख)