पाटणमध्ये ‘लाचारी-विनोदी’ शब्दांचा पिंगा
By Admin | Updated: November 25, 2015 00:32 IST2015-11-25T00:14:06+5:302015-11-25T00:32:15+5:30
आरोप-प्रत्यारोपाच्या पुन्हा फैरी : आजी-माजी आमदारांचे मंत्रिपद पुन्हा एकदा टीकाटिप्पणीच्या गर्दीत

पाटणमध्ये ‘लाचारी-विनोदी’ शब्दांचा पिंगा
मंत्रिपदासाठी शंभूराज देसार्इंची भाजपाकडे लाचारी : पाटणकर
पाटण : अपमान झाल्याक्षणी मंत्रिपदाचा राजीनामा फेकून देणारे स्वाभिमानी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला होता. लोकनेत्यांच्या नातवाला शिवसेनेचे आमदार झाल्यावर भाजपच्या मुख्यमंत्र्यामार्फत मंत्रिपदासाठी वशिला लावण्याची वेळ का आली? भाजपकडे लाचारी का पत्करावी लागली? असा सवाल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलाआहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘आ. शंभूराज देसाई यांचा शिवसेना पक्ष प्रमुखांवर विश्वास नाही म्हणूनच त्यांच्यावर दबाव आणून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? हे येणारा काळच ठरवेले. शिवसेनेशी आ. शंभूराज देसाई किती निष्ठावंत राहिले हे शिवसेनेतील नेत्यांनाच माहीत.
पाटण तालुक्यातील जनतेला मोफत वीज मिळण्याची मागणी करणारे शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे या मागणीसाठी का हट्ट धरला नाही या मागण्या फक्त निवडणुकीपुरत्या होत्या का? आणि आता निवडणूक झाली त्यामुळे तालुक्यातील जनतेची ही एक फसवणुकच म्हणावी लागेल. सत्तेसाठी स्वार्थी झालेली माणसे स्वार्थ साधला की, जनतेला कशी अपमानास्पद वागणूक देतात, हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे.
आजपर्यंत पक्षाला दुर्लक्षित करून शिवसेना व शिवसैनिकांस कसपटा समान समजून कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी राष्ट्रीय काँगे्रस पक्षाशी जवळीक साधून शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळणार का? हा सुद्धा एक विनोदाचा भाग आहे. यातच त्यांची शिवसेना पक्षावरील निष्ठा दिसून येते.
लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचा आराखडा तयार झाला आहे का? त्याचे प्लॅन इस्टिमेट तयार झाले आहे का? त्या कामाचे टेंडर मंजूर झाले आहे का? त्या स्मारकाचे स्वरूप काय असणार आहे.
याची माहिती तालुक्यातील जनतेला झाली असती तर बरे झाले असते. मात्र त्या कामाच्या भूमिपूजनाची कुदळ मात्र मुख्यमंत्री मारून गेले एवढे मात्र खरे. तालुक्यात अशी अनेक स्मारके झाली पाहिजेत. यासाठी आम्ही संमत आहोत. मात्र जनतेला सुद्धा दिलेल्या आश्वासनापैकी काही तरी पदरी पडलेच पाहिजे होते. परंतु त्यांच्या पदरी नेहमीच निराशा आली. (प्रतिनिधी)
तालुक्यातील जनतेच्या वाट्याला भोपळा
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या जीवावर व शेतकऱ्यांच्या उसावर अनेक मुख्यमंत्री व मंत्री कारखान्यावर आ. शंभूराज देसाई यांनी आणले. या मंत्र्यांचा लवाजमा आणि त्यांच्या उठाठेवीसाठी करावा लागणारा खर्च फारच मोठा आहे. त्यांच्या येण्याने पाटण तालुक्याच्या जनतेच्या पदरात काय पडले? काहीच नाही या तालुक्याच्या जनतेच्या वाटणीला या दौऱ्यातून केवळ भोपळाच आला.
पाटणकर, पत्रकबाजीपेक्षा समोरासमोर या : आ. देसाई
पाटण: ‘राज्याच्या दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी कारखान्यावर येऊन केवळ शंभूराज तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले तर माजी आमदार आणि माजी निष्क्रिय मंत्री असणाऱ्या पाटणकरांनी थयथयाट करायला सुरू केले आहे. प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना युतीने एकत्रित मिळून मला राज्याचे मंत्रिपद दिले तर पाटणकर तुम्ही काय कराल? पत्रकबाजी करून आपला राग व्यक्त करण्यापेक्षा जनतेच्या समोरासमोर या.. मग कोण लाचार आहे याचे स्पष्टीकरण मी देतो,’ असे आव्हान आ. शंभूराज देसाई यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, ‘मंत्रिपदासाठी लाचारी केली असती तर मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत शंभूराज देसार्इंचे नाव आले असते. पण शंभूराज हा स्वाभिमानी लोकनेत्यांचा नातू असल्यानेच तालुक्याला तुमच्यासारखे लाचारीचे मंंित्रपद मी आणू शकलो नाही याचे मला दु:ख आहे. मला आमदार म्हणून केवळ सहाच वर्र्षे झालेत तर राज्याच्या राजकारणात माझे नाव मंत्रिपदासाठी गाजू लागले आहे.
तुम्हाला मिळालेले मंत्रिपद तुमच्या नेत्यांनी दिले का? त्याच नेत्यांच्या घराचे उंबरे झिजवून तुम्हाला ते मिळाले हे मी एकटाच नाहीतर पाटण तालुक्यातील लहान-थोर जनता जाणून आहे. तुमचे राजकीय आणि खासगी उद्योगधंदे बंद करण्यासाठी नाही. त्यामुळे एवढे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.
पाटणकर तुम्ही या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होता की मंत्रीमंडळातील केवळ बाहुले होता याचा तालुक्यातील जनतेला आता संशय येऊ लागला आहे. ज्या स्मारकाचे भूमिपूजन करायला राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत त्या स्मारकांचा आराखडा, प्लॅन इस्टिमेट होण्याआधी शासन त्या कामाला मंजुरीच कशी देईल, एवढेही ज्ञान तुम्हाला जर नसेल तर खरोखरंच
तुम्ही निष्क्रिय आहात हे आता सिद्ध झाले आहे. मुंख्यमंत्र्यांच्या येण्याने तालुक्याच्या पदरात भोपळा पडला की जनतेच्या हिताचे निर्णय झाले हेही तालुक्यातील जनता जाणते आहे. तुम्हाला शासकीय कार्यालयातला शिपाई बोलावून येत नसेल तर ते तुमचे दुर्देव आहे,’ असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पाटणकरांना मिळालेले मंत्रिपद हाच खरा विनोद
माजी आमदार पाटणकरांना कर्तृत्त्व नसतानाही मंत्रिपद मिळाले होते तेव्हा त्यांचे मंंित्रपद राज्यात विनोदाचा भाग होता. राज्याचे मंत्री म्हणून ते काहीतरी पाटण तालुक्यात करतील अशी अपेक्षा होती. परंतु याच बांधकाम मंत्र्याच्या काळात पाटण तालुक्यातील जनतेच्या पदरात ना भोपळा पडला ना कुठला विकास. म्हणूनच तालुक्यातील जनतेनेही त्यांना २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत घरी बसविले.