मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

By Admin | Updated: November 23, 2015 00:25 IST2015-11-22T21:31:47+5:302015-11-23T00:25:09+5:30

‘जलसंवर्धना’ने नांदलमध्ये जलक्रांती : विहिरींची पाणीपातळी वाढली

Phulla pomegranate baga on Mulikewadi | मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

फलटण : येथील औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स मेगासाईट प्रकल्पाने सामाजिक बांधिलकीतून परिसरातील गावांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविलेल्या जलसंवर्धन प्रकल्पाचे हळूहळू सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, नांदल व मुळीकवाडीच्या माळावर डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या आहेत. या परिसरात बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.फलटण औद्योगिक वसाहतीत कमिन्स मेगासाईटचे काम सुरू झाल्यापासून विविध सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून परिसरातील गावात जाणवत असलेल्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. त्यात सिमेंट बंधारा बांधणे, उपलब्ध पाणीसाठ्यातील गाळ काढणे, ठिबक सिंचनपद्धती राबविणे व महत्त्वाचा भाग म्हणून जलसंवर्धनाविषयी लोकशिक्षण व जनजागृती करणे आदी बाबी आग्रहपूर्वक केल्यामुळे सद्य:स्थितीत टाकुबाईचीवाडी, नांदल, मुळीकवाडी, ढवळेवाडी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.
गेल्या पाच दशकांपासून नांदल गावाने पाण्याची कमतरता अनुभवली. मात्र, २०१२ पासून ‘कमिन्स’ने राबविलेल्या जलसंवर्धनाच्या प्रकल्पातून भूजल पातळी वाढली आहे. परिणामी शेती व पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाल्याचे गावचे माजी सरपंच अनिल कोळेकर यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर सध्या आम्ही उपलब्ध पाण्यावर कांदा, सोयाबीन, बाजरीची पिके चांगल्या प्रमाणात घेत आहोत. परिणामी लोणंद बाजारपेठेत कांदा विक्रीला पाठविणाऱ्या गावात आमच्या गावाचीही गणना होऊ लागली आहे. त्यांनी स्पष्ट केले. ‘कमिन्स’नजीक मुळीकवाडी गावात जलसंवर्धनाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे समृद्धी आली आहे.पूर्वी जेमतेम पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी टिकत होते ते आता वर्षभर टिकून राहिल्याने शेतीचे उत्पादन चांगलेच वाढले असल्याचे तेथील शेतकरी दत्ता बांदलकर यांनी सांगितले. तालुक्याच्या दक्षिण भागातील टाकुबाईचीवाडी गावाला उन्हाळ्यात नेहमी पाण्याची कमतरता भासत होती. ‘कमिन्स’ने परिसरातील दोन तलावांतील गाळ काढल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडवले गेल्यामुळे टाकुबाईचीवाडी गावच्या परिसरातील विहिरी हाताने पाणी काढण्याइतक्या काठोकाठ भरल्या असल्याचे चित्र आहे. किंबहुना या गावातील शेतकऱ्यांकडे सध्या शेतीची औजारे मोकळेपणाने खरेदी करण्याची क्षमता आली आहे. (प्रतिनिधी)


तब्बल ९६०५ तास समाजोपयोगी खर्च
‘कमिन्स’मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेतील
९६०५ तास आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध प्रकारच्या समाजोपयोगी कामासाठी खर्च केल्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले.

Web Title: Phulla pomegranate baga on Mulikewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.