फरार साधकांची छायाचित्रे झळकवा
By Admin | Updated: June 21, 2016 01:21 IST2016-06-21T00:25:40+5:302016-06-21T01:21:27+5:30
‘अंनिस’ची मागणी : तालिबानी, इसिससारख्या प्रवृत्ती बळावत असतानाही दुर्लक्ष; काँगे्रस-भाजप सरकारवर टीका

फरार साधकांची छायाचित्रे झळकवा
सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला जबाबदार असणाऱ्या सनातन आणि हिंदू जनजागरण समितीवर कायदेशीवर कारवाई करून संस्थेच्या सारंग आकोलकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील व जयप्रकाश हेगडे या फरार साधकांची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यांत, रेल्वे, बस स्थानकांमध्ये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत,’ अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत भेटणार असून, दि. २० जून रोजी ३४ महिने पूर्ण झाले; परंतु या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याने याचाही ‘अंनिस’च्या वतीने राज्यभर निषेध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या या चारही साधकांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनात सहभागाचा संशय आहे. त्यामुळे ‘एनआयआयए’च्या वेबसाईटवर त्यांचे फरार आरोपी म्हणून असलेली छायाचित्रे ‘अंनिस’तर्फे स्थानिक पोलिसांना देण्यात येणार आहेत. ही छायाचित्रे तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रेही सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक
संदीप पाटील यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही ‘अंनिस’ने स्पष्ट केले.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘केंद्रीय गुन्हा अन्वेषण संस्था (सीबीआय) यांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार सनातन साधकांच्या मार्फतच खुनाची कृती करण्यात आली आहे. २००९ मध्ये झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना ‘एनआयए’ने दाखविलेल्या गलथानपणामुळे हे संशयित फरार झाले आहेत. या गुन्ह्याचा वेळीच शोध लागला असता तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा जीव वाचू शकला असता. ‘सीबीआय’च्या ताब्यात सध्या असलेले संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे यांचा वरील चारही फरार साधकांशी संपर्क असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून, याचे गांभीर्य लक्षात घेऊन खुनाच्या गुन्ह्यांची पूर्ण उकल होण्यासाठी या चौघांची अटक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’
दरम्यान, २०११ मध्ये सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. त्यावर तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना वर्षापूर्वी दिल्लीतील संसद भवनात प्रत्यक्ष भेटून देखील या प्रकरणातील केंद्र शासनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. सनातनवर बंदी घालण्याविषयी राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने आपली भूमिका जाहीर करावी व जनतेला विश्वासात घ्यावे, अशी मागणीदेखील ‘अंनिस’ने वारंवार केली आहे. अध्यात्माच्या नावावर हिंसाचार पसरविणाऱ्या या संस्थांपासून लोकांनी दूर राहावे, असे आवाहनही ‘अंनिस’ने केले आहे.
राज्य शासनाच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने आणि तपास यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ‘अंनिस’ला मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाची मागणी करावी लागली होती. न्यायालयानेच विचारणा केल्याने सरकार व प्रशासनाला तपासाला गती द्यावी लागली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
संजीव पुनाळेकर यांची चौकशी व्हावी
हिंदू विधीज्ञ समितीचे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषदेमध्ये सारंग आकोलकर व रुद्र पाटील हे त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देशविघातक गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी संपर्कात असलेल्या अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यासारख्या वकिलाचीदेखील चौकशी होणे आवश्यक असल्याची प्रमुख मागणी ‘अंनिस’ने केली आहे.