फलटणची सुरक्षा धोक्याच्या उंबरठ्यावर!
By Admin | Updated: April 1, 2015 00:04 IST2015-03-31T22:45:45+5:302015-04-01T00:04:14+5:30
पालकांमध्ये चिंता : पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारीवरच

फलटणची सुरक्षा धोक्याच्या उंबरठ्यावर!
नसीर शिकलगार - फलटण रस्त्याने एकटी-दुकटी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीना जबरदस्तीने उचलून नेवून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटनामध्ये फलटण शहरात वाढ झाल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.
पोलीसठाण्यांना मुख्याधिकारी नसल्याने प्रभारीवरच पोलीस ठाण्याचा कारभार चालला आहे. शहराचा कायदा, सुव्यवस्था ढासळली गेल्याने व मुलींवरील अत्याचारात वाढ झाल्याने महिलावर्गात भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटण शहर असुरक्षतेचे शहर बनु लागले आहे.
फलटण तालुक्याला पहिल्यांदा एकच पोलीस ठाणे होते. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे चार पाच वर्षापूर्वी नव्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. शहर व परिसरासाठी शहर पोलीस ठाणे व ग्रामीण भागासाठी ग्रामीण पोलीस ठाणे झाले. काही महिने गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली. मात्र, मागील वर्षभरात तालुक्याची विशेषत शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने नेण्याच्या घटनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होण्याबरोबरच चोऱ्यामाऱ्या, हाणामारी यांच्या घटनामध्येही वाढ होत चालली आहे.
हाणामारीच्या व दहशतीच्या घटनामुळे लहान मुले विशेषत: शालेय मुले, सतत भितीच्या दडपणाखाली वावरताना दिसताना शालेय व कॉलेज युवतींच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याने काही पालकांनी मुलींना शाळा, कॉलेजही पाठविणे बंद केले आहे. त्यातच शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षकपद व उपविभागीय पोलीस अधिकारीपद बऱ्याच महिन्यांपासून रिक्त असून प्रभारीवरच कारभार चालला आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात होवून पोलीस आपले काय करू शकत नाहीत, अशी समज गुन्हेगारांमध्ये झाली आहे. त्यामुळे रस्त्याने एकटी जाणाऱ्या मुलीला जबरदस्तीने उचलून न्यायचे व अत्याचार करायचा या प्रकारात वाढ झालेली आहे. पंधरा दिवसात दोन घटना घडल्याने मुली व महिलांना रस्त्याने फिरणे मुश्किल होवू लागले आहे.
पालकमंत्र्याच्या आश्वासनाचे काय?
महिन्यापूर्वी फलटणच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर स्थानिक पत्रकारांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची रिक्तपदे, छेडछाडीच्या वाढलेल्या घटनाबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दोनच दिवसात गृहमंत्र्यांशी चर्चा करून रिक्तपदे भरण्याची व कायदा सुव्यवस्था सुधारविण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्यावर महिना झाला तरी काहीच झाले नाही. उलट सामुदायिक अत्याचाराच्या घटना वाढल्या.
फलटणमध्ये आज महिला मुलींना सुरक्षित बाहेर पडणे अवघड होत चालले आहे. पोलीस अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. चेन स्नॅचिंगचे प्रकार वारंवार घडत असून पोलीस तक्रारीची दखल घेत नाही. विनयभंग, अत्याचार यासारख्या घटनामुळे रात्रीचे बाहेर पडणे बंद होत चालले आहे. वारंवार बंदचे प्रकार फलटण शहरात घटत असल्याने व्यापारीवर्ग असुरक्षित आहे. फलटण महिलांसाठी सुरक्षीत राहिलेले नाही.
-अॅड. मयुरी शहा