सही बनावट; पण गजाआड निश्चित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:25+5:302021-06-06T04:28:25+5:30
सातारा : एका सहीची किंमत काय असते हे आपल्याला ठाऊकच आहे. व्यवहारांमध्ये आपल्या स्वहस्ताक्षरातील सहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ...

सही बनावट; पण गजाआड निश्चित!
सातारा : एका सहीची किंमत काय असते हे आपल्याला ठाऊकच आहे. व्यवहारांमध्ये आपल्या स्वहस्ताक्षरातील सहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कायद्यामध्येही सहीला संरक्षण मिळाले आहे. आई, बहीण, भाऊ, वडील अशा कोणाच्याही बनावट सह्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून दखलपात्रमध्ये मोडतो. हा गुन्हा न्यायालयामध्ये सिद्ध झाल्यास दहा वर्षांपर्यंत शिक्षा असते.
समाजामध्ये अनेकदा आपल्या आजूबाजूला बरेचदा फसवणुकीचे गुन्हे घडत असतात. यामध्ये विशेषत: बनावट दस्तऐवज आणि किमती दस्तऐवज या प्रकारातील गुन्हे सर्वाधिक घडत असतात. किमती दस्तऐवजामध्ये एखादी जमीन असेल, प्लॉट असेल, इमारत असेल अशा बहुमूल्य किमती वस्तूंच्या मिळकत घेण्यासाठी एखाद्याने जर बनावट सही केली तर हा मोठा गुन्हा ठरतो. अशा प्रकारचे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये दोन वर्षांत नऊ गुन्हे घडले आहेत. अनेकदा मृत व्यक्तीच्या जागी उभे राहून स्वतः व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून त्या व्यक्तीची सही केली जाते. जेणेकरून त्या व्यक्तीची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न होतो. अशावेळी मग बनावट सही केल्याचे समोर आल्यानंतर संबंधितावर तत्काळ कारवाई केली जाते. हा गुन्हा जामीनपात्र नसल्यामुळे त्याला अटकही होते. चार अक्षरांची सही आपल्याला किरकोळ वाटली असली तरी कायद्यामध्ये या सहीला अत्यंत महत्त्व आहे.
सातारा तालुक्यातील एका गावामध्ये दोन मुलांनी आपल्या मृत आजोबांची स्वाक्षरी करून त्यांच्या नावावरील जमीन लाटण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृत आजोबांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित दोन युवकांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. आजोबांची सही करताना त्या युवकांनी दोन ते तीन दिवस सराव केला होता. आजोबांचे अक्षर अत्यंत मोडीलिपीमध्ये जुन्या पद्धतीत होते. त्यामुळे जिथं दस्त केला जात होता, तेथील लोकांना शंका आली नाही. दुसरेच कोणीतरी आजोबा त्यांनी त्यावेळी उभे केले होते. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे हेच गरजेचे आहे. किरकोळ वाटत असलेली सही अनेकांना गुन्हेगारीकडे ओढत असते. त्याला काय होतंय, बघितलं तर छोटी सही आहे. कोण पाहणार आहे, असे म्हणून त्याकडे कानाडोळा केला जातो, पण जेव्हा कायद्याच्या कचाट्यात ही बनावट सही सापडते तेव्हा मात्र यातून कोणीच सुटू शकत नाही.
कोट: बनावट दस्तऐवज करणे हा मोठा गुन्हा आहे. ४२०, ४७७, ४६५, ४७१ या कलमाखाली बनावट सही करणाऱ्यावर गुन्हा दाखल होत असतो. कोणीही आपल्या आप्तस्वकीयांची असेल, किंवा मित्रांची असेल बनावट सही कधीही करू नये.
सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका.