पीककर्जाचा चेंडू सहकारमंत्र्यांच्या कोर्टात!
By Admin | Updated: April 12, 2016 00:45 IST2016-04-11T22:35:00+5:302016-04-12T00:45:29+5:30
आज मुंबईत बैठक : गोरे अन् इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार

पीककर्जाचा चेंडू सहकारमंत्र्यांच्या कोर्टात!
दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संचालक आमदार जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष थेट विधीमंडळ अधिवेशनात पोहोचला आहे. आ. गोरे यांनी अधिवेशनातच बँकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून सहकारमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलवावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून मंगळवारी मुंबई येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवड होताच बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या सभांच्या नोटीस तसेच इतिवृत्ताबाबत, कर्जप्रकरणांच्या मंजुरीपर्यंतच्या वादग्रस्त मुद्द्यांना हात घालत त्यांनी बँकेच्या गैरकारभाराविरोधात जिल्ह्यात उपोषणही केले.
नियमबाह्य मुदतवाढ देऊन बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संचालक मंडळ पाठीशी घालत असल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला होता. संचालक मंडळाच्या बैठकांना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित रहात नसल्याची तक्रारही त्यांनी अधिवेशनात केली होती. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शेतकऱ्यांच्या सवलतीच्या दरातील कर्जवाटपाच्या प्रश्नावरूनही बँक आणि आ. गोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. नाबार्डच्या परिपत्रकाचा गैरअर्थ काढून संचालक मंडळ शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप गोरे करत आहेत, तर बँकेकडून नाबार्डच्या सूचनांप्रमाणे कर्जवाटप करत असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)
निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्कंठा
आ. गोरे यांनी लागवडीपूर्वीच पाीकपाहणी करून सवलतीच्या दरातील कर्जवाटप कसे करणार, असा प्रश्न थेट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच विचारला होता. जिल्हा बँकेतील संचालकांचा मनमानी कारभाराबाबत मुंबईत बैठक बोलाविण्याचीही मागणी आ. गोरे यांनी केली होती. मंगळवार, दि. १२ रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली. हजारो शेतकरी सभासद असलेल्या सातारा जिल्हा बँकेचा पीकपाहणी करून सवलतीच्या दरातील कर्जवाटप हा मुद्दा जिल्हाभर चांगलाच चर्चेत आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा निघणार, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्कंठा आहे.