राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी पवार सांगलीत
By Admin | Updated: August 24, 2015 23:39 IST2015-08-24T23:38:59+5:302015-08-24T23:39:24+5:30
तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील

राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी पवार सांगलीत
सांगली : जिल्ह्यातील विशेषत: तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीची पडझड थांबविण्यासाठी खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरत असल्याचे वृत्त आहे. येत्या ३१ आॅगस्टला ते सांगली दौऱ्यावर येणार असून, यावेळी दिवसभर पक्षसंघटन बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये समन्वय समितीऐवजी आता आ. जयंत पाटील यांच्याकडेच एकहाती सूत्रे देण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत.
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजप प्रवेश करून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभेपूर्वी विलासराव जगताप (जत), पृथ्वीराज देशमुख (कडेगाव), अजितराव घोरपडे (कवठेमहांकाळ), अनिल बाबर (खानापूर), दिनकर पाटील (सांगली) या राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडत भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. एवढ्या मोठ्या पडझडीनंतरही आर. आर. पाटील यांनी पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगलीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातच विधानसभेपूर्वी नव्याने नेते घडविण्याचा व पक्षाची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढविण्याचा निर्धार केला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पक्षाला जबरदस्त दणका बसला. दहापैकी केवळ दोनच जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले, तरीही या दोन दिग्गज नेत्यांमुळे पक्षसंघटनेची चिंता वरिष्ठ नेत्यांनाही वाटत नव्हती. मात्र, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळसह जिल्ह्याच्या राजकारणावर विपरीत परिणाम झाला. विशेषत: दोन्ही तालुक्यांतील त्यांच्या समर्थर्कांची घुसमट सुरू झाली. आर. आर. यांच्या पश्चातही राष्ट्रवादीचा किल्ला मजबूत राहावा, यासाठी शरद पवार यांनी तेथे समन्वय समितीची नेमणूक केली. मात्र, समितीच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीत भर पडली. जयंत पाटील यांनीही समन्वय समितीद्वारेच निर्णय घेतले. तथापि, जिल्हा बॅँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसला. आर. आर. पाटील यांच्या अनेक समर्थकांचे सूर त्यांचे बंधू सुरेश पाटील यांच्याशी जुळले नाहीत. आ. सुमनताई पाटील यांच्या राजकीय अनुभवाची कमतरता आणि सक्षम राजकीय नेतृत्वाचा अभाव यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घुसमट वाढत आहे. त्यातूनच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर. आर. पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार संजय पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे आकर्षित होत आहेत. २८ आॅगस्टच्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाने राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. तासगावचा बुरूज पुन्हा मजबूत करण्याच्यादृष्टीने शरद पवार तेथील नियोजनासाठी मैदानात उतरणार आहेत. पक्षाची पडझड, कार्यकर्त्यांमधील नाराजी यावर ३१ आॅगस्टच्या बैठकीत कार्यकर्त्यांना पवार मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.
मोठी पडझड
तासगाव बाजार समितीच्या निवडणूक निकालाने राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला उत्साह सांगली बाजार समिती निवडणुकीच्या निकालाने ओसरला. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक नाराजीला तोंड द्यावे लागले. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या नाराजीबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून सुरू झालेली ही नाराजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही कायम असल्याने, या तातडीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
समन्वय समिती बरखास्त होणार!
जयंत पाटील यांचे नेतृत्व तासगाव-कवठेमहांकाळच्या आर. आर. गटाच्या कार्यकर्त्यांना मान्य होईल की नाही, या शंकेने तेथे समन्वय समिती स्थापन केली होती. मात्र, आता या समितीबाबतच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समन्वय समितीबाबत ३१ आॅगस्टच्या बैठकीत फेरविचार होण्याची शक्यता आहे. आर. आर. पाटील यांच्याकडे जशी दोन्ही तालुक्यांची एकहाती सूत्रे होती, तशीच सूत्रे आता जयंत पाटील यांच्याकडे सोपवली जाण्याची चिन्हे आहेत.