ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:23+5:302021-02-07T04:36:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड - ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड - पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित ...

ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड - ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड - पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एस. टी. थांबा प्रवासी शेड हटविल्या आहेत. पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावरच उभे राहून एस. टी.ची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे ज्याठिकाणी प्रवासी शेड हटविण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे
उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून रस्ता दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे. उंडाळे ते तुळसण फाटा दरम्यान मोठमोठ्ठे खड्डे पडले असून, रस्त्याच्याकडेने झाडे-झुडपे वाढली आहेत. या रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाडला बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये हरित शपथ
कऱ्हाड : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रम झाला. त्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना हरित शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. प्राचार्य घाटगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण कसे होईल, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्वे विभागामध्ये ऊसतोडीला आला वेग
कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊस तोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करुन थंडीमुळे रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊसतोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून, पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
साथरोगाची शक्यता; गावोगावी जनजागृती
कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथरोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या रुग्णालयेही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही गावांमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ही परिस्थिती इतर गावात उद्भवू नये, यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
पाटण तिकाटणे येथील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे
कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी कचरा पडत असून, याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. कचऱ्यामुळे अधूनमधून आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मांस, अन्नपदार्थ तसेच घरगुती कचरा याठिकाणी टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याभोवती श्वानही घुटमळत आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरातून पायी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. भटके श्वान नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने येथील कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.