पंचांची करामत.. पण वस्तीची पंचायत !
By Admin | Updated: March 5, 2016 00:08 IST2016-03-04T22:08:30+5:302016-03-05T00:08:07+5:30
समाजातील महिलांचेही बंड : पाचवडमधील जातपंचायतीच्या घटनेनंतर समाजाचा हल्लाबोल; जातपंचायत बरखास्त करण्यावर काहीजण ठाम--आॅन दि स्पॉट...

पंचांची करामत.. पण वस्तीची पंचायत !
सातारा/पाचवड : ‘साहेब, आमच्या समाजात बघा आजवर असंच होत आलंय... कुणीबी चूक केली तर त्याला पंचायत शिक्षा देती... ती भोगली की त्याला माफ करून समाजात मानाने वागवलं जातं... हे आजवर असंच चालत आलंय; पण आता खरंच बस्स झालंय. हे कुठं तरी थांबलंच पाहिजे बघा...’ हे शब्द आहेत पाचवड येथील गोपाळवस्तीमधील महिलांच्या तोंडचे. जातपंचायतीत बाप-लेकीला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांचा ताफा ‘अंनिस’चे कार्यकर्ते तेथे गेले होते. त्यांच्यासमोर या भगिनींनी आतल्या आवाजाला वाट मोकळी केली.वाई तालुक्यातील पाचवड येथे कुडाळ रस्त्यावर एक इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत भावी पिढी घडवली जात असताच, काही अंतरावरील गोपाळवस्तीत अघोरी प्रकार सुरू होता. पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून दोघांना बांधून मारहाण केली गेली. त्यांना सात हजारांचा दंडही करण्यात आला. हा प्रकार समजल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पोलीस अधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकारात सामील असल्यांनी तत्काळ काढता पाय घेतला; मात्र असंख्य तरुण, महिलांनी या मंडळींना सहकार्य केले. यावेळी जमलेल्या युवकांनी समाजात यापुढे हा प्रकार चालू देणार नाही, अशी ग्वाही दिली. तर समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंनिस व पोलिसांनी संयुक्तरीत्या कृतिआराखडा तयार केला आहे. यामध्ये समाजात चमत्कारविरोधी प्रयोग, जनजागृती केली जाणार आहे.
आरोपींविरुध्द चार कलमांचा समावेश..
जातपंचायतीचे आयोजन करणाऱ्या सर्जेराव पवार (रा. पाचवड), शिवाजी पवार (रा. सुरूर), सर्जेराव चव्हाण (रा. भुर्इंज), राजाराम चव्हाण (रा. कडेगाव), जीवन पवार (रा. नागेवाडी, ता. सातारा), दत्तू चव्हाण (रा. जोशी विहीर) आणि अरुण दिलीप जाधव (रा. पेरले, ता. कऱ्हाड) या पंचांवर १२० ब नुसार सामाईक कट रचणे, ३८६ (भीती घालून पैसे उकळणे), ३२३ (दुखापत करणे) व ३२४ (गंभीर दुखापत करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे जातपंचायत...
गोपाळ समाजामध्ये एखाद्या व्यक्तीकडून जर गैरकृत्य घडले तर त्याला या समाजामध्ये स्थान दिले जात नाही. त्याच्या हातून कोणतेही सामाजिक अथवा कौटुंबिक कार्य केले जात नाही. अशावेळी कायद्याने बंदी घातलेली; परंतु त्यांच्या परंपरेनुसार जातपंचायत बोलावून पंच मान्य करतील, अशी शिक्षा त्याला दिली जाते. समाजामध्ये सामील करून घेतले जाते. या जातपंचायतीमध्ये पंच जे ठरवतात, ती शिक्षा त्या व्यक्तीला भोगावीच लागते, तरच तो त्यांच्या समाजात पुन्हा कार्यरत होऊ शकतो.
न्याय व्यवस्थेलाच आव्हान :
हमीद दाभोलकर
सातारा : ‘पाचवड येथील गोपाळ समाजाने गुरुवारी जातपंचायत भरून त्यामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्या मुलीला व तिच्या वडिलांना जातपंचायतीने फटके मारण्याची शिक्षा दिली. जातपंचायतीने अशाप्रकारे शिक्षा देणे म्हणजे थेट न्याय व्यवस्थेलाच दिलेले आव्हान आहे,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केवळ दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१५ पारित केला आहे. साताऱ्यासारख्या प्रगतशील जिल्ह्यात अशी घटना घडणे, हे निंदनीय आहे. या जातपंचायतीमध्ये ज्या लोकांनी पंचांची भूमिका निभावली व पीडितांना शिक्षा ठोठावली त्यांना तातडीने अटक होऊन कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
पंचायतीत ‘कायदा’ नव्हे ‘शब्द’ चालतो!
गोपाळ समाजात भरणाऱ्या जातपंचायतीचा ‘अजब’ न्यायनिवाडा वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. या पंचायतीत कायदा कुठेही गृहित धरला जात नाही. कायद्याऐवजी इथं फक्त पंचांचा ‘शब्द’ चालतो. ते सांगतील ती शिक्षा आणि करतील तो दंड. आत्तापर्यंत पंचांकडून बहुतेकांना फटके लगावण्याचीच शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पेरलेतील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. या प्रकारावर त्यावेळी ‘अंनिस’नेही आक्रमक भूमिका घेत समाजाची बैठक आयोजित केली. पोलिसांसमोर झालेल्या बैठकीत यापुढे भागात जातपंचायत न भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच पाचवडमध्ये जातपंचायतीच्या अजब निवाड्याचा प्रकार समोर आला आहे. वास्तविक, पंचांच्या या निवाड्याचा फटका आजपर्यंत अनेक कुटुंबांना बसला आहे. मात्र, बहिष्कृत होण्याच्या भीतीने संबंधित कुटुंबे मूग गिळून गप्प आहेत.
जिल्ह्यामध्ये हा समाज वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाला आहे. त्यातील मोजकी मंडळी एकत्रित करूनच पंचायतीची स्थापना केली जाते. पंच होण्यासाठी अनुभव व ज्येष्ठत्व एवढेच निकष लावले जातात. एखाद्या गावात समाजातील व्यक्तीने पंचायत बोलावलीच तर आसपासच्या गावातील पंचांनाही त्याठिकाणी बोलावून घेतले जाते. त्यानंतर पक्षकार व आरोपीच्या कुटुंबासमोरच न्यायनिवाडा करण्यासाठी पंचायत बसते. पक्षकाराचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन आरोपीला शिक्षा ठोठावली जाते. यामध्ये चोरी, मारामारी यासारखे किरकोळ गुन्हे असल्यास त्याला पाच फटक्यांची तर मोठा गुन्हा असल्यास दहा फटक्यांची शिक्षा दिली जाते. फटके देण्यासाठी वेत, निरगुडी किंवा इतर झाडांची ओली काठी वापरली जाते. संबंधिताला दंडही सुनावण्यात येतो. दंड ाची रक्कम पंचांच्या वाटखर्चीसाठी वापरली जाते.