पाडळोशी तलाठ्यांना ‘पळता भुई थोडी’!
By Admin | Updated: July 13, 2014 22:28 IST2014-07-13T22:27:28+5:302014-07-13T22:28:51+5:30
तीन सजांचा भार : मल्हारपेठच्या मंडलाधिकाऱ्यांकडे चाफळचा ‘चार्ज’

पाडळोशी तलाठ्यांना ‘पळता भुई थोडी’!
चाफळ : विभागात महसूल खात्याचा सावळागोंधळ सुरू आहे. वर्षभरापासून विभागातील तलाठ्यांच्या वारंवार बदल्या केल्या जात आहेत. एका तलाठ्याकडे अनेक गावांचा चार्ज असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. चाफळ विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता बहुतांश गावे डोंगरकपारीत वसल्याचे दिसून येते. विभागात एकूण २२ गावे व २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. चाफळ मंडलामध्ये सहा सजांचा समावेश आहे. सध्या येथील एका कर्मचाऱ्यावर तीन सजांचा कार्यभार सोपविल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. यातच मंडल अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचेही पद रिक्त आहे. चाफळ मंडलामध्ये डेरवण, चाफळ, नाणेगांव बुद्रुक, पाडळोशी, उरूल, वजरोशी या सहा सजांचा समावेश होतो. यातील चाफळच्या तलाठ्यांना एक वर्ष होतेय ना होतेय तोच त्यांची कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथे बदली करण्यात आली. सर्वच शासकीय खात्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षांनंतर होतात. मग चाफळच्या या तलाठ्यांची एका वर्षातच बदली का झाली, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावू लागला आहे. नाणेगाव बुद्रुकचे तलाठी रजेवर असल्याने त्यांचा व चाफळच्या तलाठ्यांचा अतिरिक्त कार्यभार पाडळोशी सजाच्या तलाठ्यांना सोपवण्यात आल्याने त्यांना पळताभुई थोडी झाली आहे. यातच भरीस भर पडून मंडलाधिकारीही सेवानिवृत्त झाल्याने त्यांचीही जागा रिक्त पडली आहे. त्यांचा तात्पुरता कार्यभार मल्हारपेठच्या मंडलाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचे समजते. एकूणच चाफळ मंडलामध्ये ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ या उक्तीप्रमाणे महसूल विभागाचा कारभार सुरू आहे. विभागातील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून प्रत्येक सजासाठी स्वतंत्र व सक्षम कर्मचऱ्यांच्या नेमणुका करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)