कऱ्हाडात ‘हॉकर्स झोन’साठी संघटना आक्रमक
By Admin | Updated: May 20, 2016 00:04 IST2016-05-19T22:43:18+5:302016-05-20T00:04:31+5:30
‘अतिक्रमण हटाव’चा प्रश्न चिघळला : पालिकेच्या कारवाईमुळे हातगाडाधारक संतप्त; मंगळवारी बेमुदत उपोषण

कऱ्हाडात ‘हॉकर्स झोन’साठी संघटना आक्रमक
कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व हॉकर्स संघटना यांच्यामध्ये शहरात अतिक्रमण झोन उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर शहरात हॉकर्स झोन निर्माण होणार असे वाट होते. याबाबत संघटना पदाधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांच्यात बैठकीतून चर्चाही झाली होती. मात्र, यानंतर गुरुवारी पालिकेने शहरातील हातगाडाधारकांवर कारवाई करत अतिक्रमणे काढली. त्यामुळे आता पालिकेच्या या कारवाईविरोधात संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारपासून बेमुदत आंदोलनास बसण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. परिणामी आता शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न चिघळला आहे.
पालिकेकडून गुरुवारी सकाळी दत्त चौक ते कृष्णा नाका या मार्गावरील अतिक्रमणे पालिका कर्मचाऱ्यांकडून हटविण्यात आली. अचानकपणे केलेल्या अतिक्रम हटाव मोहिमेमुळे शहरातील चारचाकी हातगाडाधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही काही लक्षात आले नाही. पालिकेने केलेल्या कारवाईनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, जोपर्यंत शहरात हॉकर्स झोन निश्चित होत आहे नाही. तसेच विक्रेत्यांना जागा दिली जात नाही. तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा पालिकेला दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष जावेद नायकवडी यांनी पालिकेत गुरुवारी दुपारी दिले.
यावेळी सतीश तावरे, प्रमोद तोडकर, हरिबा बल्लाळ, गजानन कुंभार आदींसह चारचाकी हातगाडाधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हॉकर्स झोनबाबत तीन वेळा फेरीवाला समितीची बैठक पालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनात झाली होती. त्यावेळी संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्या पालिकेने मान्यही केलेल्या होत्या. मात्र, त्यानंतर पालिकेकडून संघटनेने सुचविलेल्या जागांची पाहणी करण्यात आली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्याने याबाबत अनेकवेळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच माहिती देण्यात आली नाही.
अखेर गुरुवारी अचानकपणे सकाळी पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दत्तचौक ते कृष्णानाका या मार्गावरील पाच ते सहा हातगाडे हटविले. करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील कारवाईमध्ये बांधकाम तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह ट्रॅक्टरचा समावेश करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
पाच महिन्यांत तीन वेळाच बैठक...
कऱ्हाड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अतिक्रमणाच्या विषयावर प्रत्येक महिन्यात चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असते. त्यासाठी फेरीवाला समितीही कार्यरत आहे. मात्र, या समितीच्या वतीने पाच महिन्यांत तीनच वेळा बैठक घेण्यात आली आहे. तसेच त्यातही कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अखेर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
शहरतील फेरीवाला समितीच्या बैठकीत पालिका व संघटनेमध्ये यापूर्वी सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. तसेच संघटनेने सुचविलेल्या जागांवर पालिका विचार करून निर्णयही घेणार होती. मात्र, आता पालिकेने न सांगता केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पालिकेच्या विरोधात मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसणार आहोत.
- जावेद नायकवडी,
तालुकाध्यक्ष, चारचाकी हातगाडी संघटना, कऱ्हाड