आगामी काळात प्रस्थापितांकडेच हुकमाचे पान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:13+5:302021-02-05T09:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कधी नव्हे त्या उलट्या पध्दतीने निवडणुकीनंतर आरक्षण सोडत ...

आगामी काळात प्रस्थापितांकडेच हुकमाचे पान!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कधी नव्हे त्या उलट्या पध्दतीने निवडणुकीनंतर आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीत काही गावांमध्ये प्रस्थापितांचा हिरमोड झाला असला तरी मोठ्या गावांमध्ये प्रस्थापितांकडेच हुकमाचे पान राहणार आहे.
सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये ४० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांमध्येच प्रामुख्याने घमासान झाले. काही ठिकाणी राष्ट्रवादीने देखील आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडलेली आहे. गाव कोणाच्या ताब्यात हे देखील निश्चित झालेले आहे. या ग्रामपंचायत सत्तेचा फायदा अनेकांना सोसायटी, जिल्हा बँक व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे अनेकांचे महत्त्व वाढले तर काहींचे कमी देखील झाले आहे.
कोडोली, गोवे, खोडद, करंडी, कोंडवे, मत्यापूर, पिलाणी, आसनगराव, वावरदरे, कण्हेर, राकुसलेवाडी, परळी, अंबवडे खु., पाडळी, काळोशी, धनवडेवाडी, पेट्री अनावळे, मस्करवाडी, मापरवाडी, माळ्याची वाडी, शहापूर, डबेवाडी, अपशिंगे, इंगळेवाडी, बोरगाव, रामकृष्णनगर, डोळेगाव, आवाडवाडी, कामथी तर्फ सातारा, चोरगेवाडी, संभाजीनगर, फत्यापूर, चिंचणेरवंदन, चिंचणी, जिहे, परमाळे, मोरेवाडी, अंबेवाडी, निगडी तर्फ सातारा, देवकल पारंबे, पाटखळ, चिंचणेर सं निंब, टिटवेवाडी, आष्टे, आंबळे रायघर, अंगापूर तर्फ तारगाव, आकले, जैतापूर, जांभगाव, वेणेगाव, वर्णे, वनगळ, बसाप्पाचीवाडी, बोर्णे, भाटमरळी, हमदाबाज, चिंचणी, खडगाव, धनगरवाडी, अतित या ग्रामपंचायतींमध्ये पुरुषच गावचा कारभारी असणार आहेत. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना गावाचा कारभार स्वत:कडे ठेवण्याची संधी मिळाली.
या निवडणुकीचा परिणाम आगामी सोसायटी, जिल्हा बँक, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार आहे. नेत्यांचे महत्त्व निवडणुकीत वाढणार आहे. तसेच त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सातारा तालुक्यातील बहुतांश गावे ही सातारा-जावळी, कोरेगाव व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाटली गेली आहेत. साहजिकच स्थानिक नेत्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे.
स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले सदस्य हे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणारे आहेत. आता शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेले असले तरी ते सदस्य अजून देखील राष्ट्रवादीमध्येच आहेत. आता आगामी निवडणुकांमध्ये या सदस्यांची भूमिका काय असेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सातारा तालुका निवडणूक विश्लेषण