हातगाड्यावर संत्र्यांची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:12+5:302021-01-08T06:07:12+5:30
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे साताऱ्यातील गलोगल्ली फिरत असलेल्या हातगाड्यांवर संत्र्यांची भिंत ...

हातगाड्यावर संत्र्यांची भिंत
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे साताऱ्यातील गलोगल्ली फिरत असलेल्या हातगाड्यांवर संत्र्यांची भिंत पाहायला मिळत आहे. (छाया : जावेद खान)
०४जावेेद११
------------
रुग्णांमध्ये वाढ
शिरवळ : सातारा जिल्ह्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या काही दिवस ढगाळ वातावरण तयार होत आहे. अनेकवेळा सूर्यनारायणांचे दर्शनही घडत नाही. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. यामुळे दवाखान्यात गर्दी होत आहे.
००००००००
खावलीची यात्रा रद्द
सातारा : सातारा तालुक्यातील खावली येथील नवराई देवी व श्री रामवरदायिनी देवीची यात्रा ६ व ७ जनोवारीला होत असते. ही यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. देवीची नित्यपूजा कार्यक्रम पुजारी व यात्रा कमिटीच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये हा निर्णय घेतला. यात्रा काळात मंदिर व मंदिर परिसरात गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
---------
शिवशाहीला फटकाच
सातारा : राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. तसेच एसटी महामंडळाच्या शिवशाही गाड्याही रस्त्यावर आणल्या आहेत. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने खासगी शिवशाही गाड्या अद्यापही बसस्थानकातच लावलेल्या आहेत. प्रवासी संख्या वाढल्यावर याही बाहेर काढणार आहेत.
००००००
फुलझाडे वाळली
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात मोठ्या प्रमाणावर फुलझाडे लावण्यात आली आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांना पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकातील फुलझाडे वाळून चालली आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
००००००
स्वच्छतागृहाचा अभाव
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.
००००००००
तिळगुळासह रेवड्या बाजारात दाखल
सातारा : मकरसंक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठी साताऱ्यातील बाजारपेठ फुलली आहे. बाजारात तिळगूळ, रेवड्या दाखल झाल्या आहेत. कोरोनानंतर अनेक उद्योगांना फटका बसला होता. त्यानंतर महागायी वाढली आहे. याचा परिणाम रेवड्या, तिळगूलावर बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
०००००००००
संक्रांतीत काळजी
सातारा : मकरसंक्रांतीला महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रम घरी आयोजित करत असतात. यावेळी एकमेकींना वाण दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा धोका असल्याने याबाबत महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी धोका कमी झालेली नाही.
०००००००
शाळांतून तांदूळ वाटप
मेढा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तांदूळ नियमीत दिला जात आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळत आहे. कोरोना काळात तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना धान्य कमी पडणार नाही, याची काळजी शिक्षक मंडळी घेत होते. त्यामुळे उपासमार तरी टळली होती.
००००
दुकानदारांची त्रास
सातारा : सातारा शहराच्या उपनगरात असलेल्या अनेक स्वस्तधान्य दुकानदारांकडून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. रेशन दुकान उघडण्याच्या वेळेत ग्राहक त्यांचे काम बाजूला ठेवून आलेले असतात. तरी हे दुकान बंद असते. त्यामुळे विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
०००००००
सांडपाणी रस्त्यावर
खटाव : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत योग्य ती सुविधा राखली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे.
०००००००
प्रचाराला सुरूवात
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज माघार घेण्याची मुदत सोमवारी संपली त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. साहजिकच गावोगावी उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. वेळ कमी असल्याने अनेकांनी यापूर्वीच घरभेटीस सुरूवात केली आहे.
०००००००
स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने दुर्गंधी
भुईंज : भुईंज येथील बेघरवस्तीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. त्याची ग्रामपंचायतीच्यावतीने नियमीत देखरेख केली जात नाही. त्यामुळे येथील स्वच्छतागृहातून दुर्गंधी पसरत आहे. जिल्ह्यात अगोदरच वातावरणात वारंवार बदल होत असल्याने रोगट वातावरण झाले. त्यामुळे यापासून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यांची स्वच्छता राखण्याची मागणी केली जात आहे.
०००००००
सेतू कार्यालयात गर्दी
सातारा : साताऱ्यातील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सेतू कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागातून नागरिक या ठिकाणी विविध शासकीय कामासाठी येतात. त्यामुळे दर सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे.
००००००
नियमांचे उलंघन
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी कोरोना सेंटरकडील गेट तर बाहेर येण्यासाठी व्यापारी संकूलकडील गेट असे नियोजन केले आहे. तरीही अनेक एसटी चालक बाहेर पडण्याच्या गेटमधूनच बसस्थानकात गाड्या नेत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.
००००००००
विद्युत खांब वाकल्याने ग्रामस्थांना धोका
भुईंज : भुईंज येथील बौद्धवस्तीतील विद्युत खांब मोठ्या प्रमाणावर वाकला आहे. त्यामुळे वीज वाहक तारांचा झोला तयार झाला आहे. या खांबातच गटारीचे पाणी मुरत आहे. त्यामुळे विजेचा झटका बसतो की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटत असते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या ठिकाणचा खांब दुरुस्त करण्याऐवजी नवीनच खांब बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार केली जात आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.