विधानसभेतील विरोधक; डीसीसीला मित्र!
By Admin | Updated: May 1, 2015 00:17 IST2015-04-30T21:32:59+5:302015-05-01T00:17:41+5:30
शेखर गोरे तात्यांबरोबरच : राष्ट्रवादीच्या पॅनेलसोबत राहणार अनिल देसाई--सांगा डीसीसी कोणाची ?

विधानसभेतील विरोधक; डीसीसीला मित्र!
नितीन काळेल - सातारा -राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, असे आपल्याकडे सांगितले जाते. याचा प्रत्यय आता माण तालुक्यात येऊ लागला आहे, ते सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकमेकांचे विरोधक असलेले आता एकत्र आले आहेत. माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना शेखर गोरेंची खंबीर साथ आहे. तर बँकेचे संचालक अनिल देसाई हे राष्ट्रवादीमुळे पोळ तात्यांबरोबर राहणार! सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधातील पोळ, देसाई आणि शेखर गोरे आता आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात असणार आहेत. आता या निवडणुकीत पोळ तात्यांचा अनुभव व अनेकांची मिळणारी ‘साथ’ कामाला येते की आमदार जयकुमार गोरे यांची बँकेत एंट्री होते, हे महत्त्वाचे आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासून माण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते. यावेळी माणमधील इच्छुकांची संख्याही अधिक होती. आमदार गोरे, माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक सदाशिवराव पोळ, संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, अर्जून काळे, युवराज बनगर आदींनी बँक निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून आपले अर्ज सादर केले होते. आमदार गोरे हे सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे अपेक्षित होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी अर्ज काढून घेतले. अनिल देसाई हे निवडणूक लढविणार हे निश्चित होते. त्यांची बिनविरोध निवड होणे आश्चर्यचकित करणारे ठरले. सोसायटी मतदारसंघात आमदार गोरे आणि पोळ यांच्यातील लढत अपेक्षितच आहे. मात्र, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांची ओबीसी मतदारसंघातून माघार धक्कादायक बाब मानली जात आहे. कारण, तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी मी जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. माजी आमदार पोळ व शेखर गोरे यांनी एकत्र येत अनेक सोसायटींवर व ठरावावर कब्जा केला. बँकेसाठी अर्ज भरताना तात्यांनी सोसायटी तर शेखर गोरे यांनी ओबीसीमधून अर्ज भरला. सत्ताधारी राष्ट्रवादीकडून सदाशिवराव पोळ यांच्याबरोबरच शेखर गोरे यांना उमेदवारी मिळणार, हे नक्की होते.
पण, शेवटच्या दिवशी शेखर गोरे यांनी आपला अर्ज काढून घेतला. त्याबद्दल त्यांनी कोठेही नाराजी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेतलेले शेखर गोरे आता पोळ यांना मदत करणार का हा प्रश्न आहे. शेखर गोरे यांनी अर्ज माघार घेणे, हे अपमानीत करण्यासारखेच घडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीबरोबर राहिलेले शेखर गोरे पोळ यांना मदत करणार का, हा प्रश्न आहे. तसेच त्यांचे बंधू आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे त्यांचा कल वाढणार, हे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. असे असले तरी सध्यातरी शेखर गोरे यांनी मी पोळ यांच्याबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकारणात लवचिकता ठेवावी लागते, असेही त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
आता माणच्या राजकारणात सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे व सदाशिवराव पोळ यांच्यात समोरासमोर सामना होत आहे. अशावेळी शेखर गोरे हे पोळ यांच्याबरोबर राहणार आहेत. तर दुसरे संचालक व जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई हेही बँकेतील सत्ताधारी पॅनेलबरोबर असणार आहेत. त्यामुळे आमदार गोरेंना एकट्याने ही लढाई लढणे कमप्राप्त झाले आहे. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्टे म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी आमदार गोरे, पोळ, देसाई आणि शेखर गोरे हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. देसाई फक्त अपक्ष लढलेले तर इतर तिघांचे वेगवेगळे पक्ष होते. आता ते चित्र बदलले आहे.
शेखर गोरे हे पोळ तात्यांबरोबरच दिसत आहेत. माणमध्ये राष्ट्रवादीत काही गट आहेत. त्यामध्ये देसाई यांचा एक गट आहे. पोळ आणि देसाई गटामध्ये फारसे सख्य नाही; पण, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलबरोबर राहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे देसार्इंची पोळ यांना साथ मिळू शकते. माणमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस असली तरी या निवडणुकीत ती राहणे आमदार गोरेंसाठी जमेची बाजू ठरू शकते.
काठावरची लढत कोणाच्या नशिबात...
माणमधील सोसायट्यांचे ठराव झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखर गोरे हे एकत्र होते. राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वत:च्या ताकदीवर ठराव घेतले आहेत. पोळ व शेखर गोरे यांच्या ठरावांची बेरीज तसेच आमदार गोरे यांचे बाजूचे ठराव पाहिले तर दोन-चारचाच फरक आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेखर गोरे राष्ट्रवादीबरोबर राहिले तरच पोळ यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. तरच पोळ व आमदार गोरे यांच्यात काठावरची लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार समसमान पातळीवर असल्याने निवडणुकीत कोणालाही गाफिल राहून चालणार नाही. त्यामुळे सर्वच गटांनी मतदार अज्ञातस्थळी हलविले आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत मी माघार घेतली आहे. कारण, ओबीसी मतदारसंघासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मतदान होत असते. माण तालुक्यापुरते मतदान मर्यादित असते तर मी निवडणूक नक्कीच लढविली असती. राजकारणात कधी-कधी लवचिक भूमिका घ्यावी लागते. म्हणून निवडणुकीतून अर्ज माघार घेतला आहे. आता या निवडणुकीत मी पोळ तात्यांच्याबरोबर असणार आहे.
- शेखर गोरे, सदस्य माण पंचायत समिती
सातारा जिल्हा बँकेत मी बिनविरोध म्हणून निवडून गेलो आहे. यापुढेही लोकहिताचीच कामे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी केलेल्या सहकार्यामुळेच मी निवडून आलो. या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलसोबत असणार आहे.
- अनिल देसाई, संचालक जिल्हा बँक