उद््घाटन झोकात; पाणी नाही रानात!
By Admin | Updated: November 9, 2014 23:28 IST2014-11-09T22:36:26+5:302014-11-09T23:28:16+5:30
तारळे-बांबवडे योजना : पोटपाटाचे काम रखडल्याने शेतकरी हवालदिल

उद््घाटन झोकात; पाणी नाही रानात!
तारळे : तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन होऊन वर्ष व्हायला आले तरी अजून पोटपाटाच्या कामाला सुरूवात झाली नाही. शेतकऱ्यांच्या उशाला धरण असूनही घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निदान यंदा तरी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तारळी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेची दोन पंपहाऊस बांधून पाईपलाईनची कामे पूर्ण झाली आहेत. यातून शेतीला पन्नास मीटर हेडपर्यंत पाणी उचलून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त पावसाळ्यात पाणी मिळणारी शेती बारमाही पाण्यासाठी आसुसली आहे. मात्र पोटपाटाच्या पाण्याला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्याअभावी शेतातील पिके करपून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. शेती आहे; मात्र पाण्यावाचून तारळे भागातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पाणी उपलब्ध असूनही शेतीला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास वर्षभरानंतरही पोटपाटाच्या कामात चालढकल होत असताना शेतकऱ्यांना नदीतून वाहणाऱ्या पाण्याकडे बघत बसावे लागत आहे. (वार्ताहर)
शेकडो हेक्टर क्षेत्र वंचित
तारळे भागातील शेकडो हेक्टर जमीन पाण्यावाचून वंचित आहे. संबंधित विभाग आज काम सुरू होईल, उद्या होईल, अशी आश्वासने देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमून संताप व्यक्त होत आहे.
बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाचे काम कण्हेर विकास विभागाकडे आहे. एक महिन्यानंतर पोटपाटाच्या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.
- संजय पाटील,
उपअभियंता, नागठाणे कार्यालय
तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजना अजून पोटपाटाच्या प्रतीक्षेत आहे.