अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:49+5:302021-01-08T06:05:49+5:30

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा ...

Offer lakhs to candidates for withdrawal of applications | अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा भाव वधारला असला तरी, जनमताच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून लाखोंची ऑफर धुडकावून निवडणुकीच्या मैदानात थेट सामना करण्याचे खुले आव्हान दिले जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील वाठार, किरोली, तारगाव, साप, धामणेर, सायगाव, सासुर्वे, सुर्ली, रिकिबदारवाडी, दुर्गवाडी, काळोशी आदी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सोमवारी दुपारी तीन वाजता संपला. तत्पूर्वी दोन दिवस काही गावांतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात होती. यामध्ये अगदी एक ते दीड लाख रुपये देतो व सोसायटीध्ये पाच वर्षे चेअरमन करतो, आदी ऑफरचा समावेश आहे. आपल्या वॉर्डामधील मतदारांचे पाठबळ असलेल्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, तर आपला मार्ग सुकर होईल, या आशेने आणि लढत झाली तर आपला पराभव अटळ आहे, या भीतीने काही जणांकडून या उचापती केल्या जात होत्या. परंतु कुठल्याही ऑफरला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे लढतीला सामोरे जाण्याच्या तयारीमुळे, भानगडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही जणांकडून विरोधी उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. यासाठी उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्याची नोकरी घालविण्याची भीती दाखवली जात होती. मात्र, संबंधित उमेदवारानेही नोकरी घालविण्याची भीती दाखवणाऱ्याच्या वरती आपली पोहोच असल्याचे दाखवून दिल्याने, भानगडखोरीला चांगलाच लगाम बसला आहे. शेरास सव्वाशेर भेटल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या आणि दारुण होणारा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने जनमत नसलेल्या उचापती करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य उमेदवाराच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते. मतासाठी जेवणावळी व आमिष दाखविण्याची गरज त्यांनाच पडते, ज्यांच्यामागे जनमत नाही. जेवणावळी घालणाऱ्यांना जनता कधीच पाठबळ देत नाही, याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत जेवणावळी घालून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आलेला आहे. तरीही निवडणुका आल्या की अंगात येणाऱ्यांच्या गमती जमती पाहून मतदारांसह ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या उचापतखोरांच्या भानगडींची चर्चा गावातील पारावर व चौका-चौकात चांगलीच रंग रंगत आहे.

(ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान असा लोगो वापरावा

Web Title: Offer lakhs to candidates for withdrawal of applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.