निरीक्षण फुलांतील बदलाचे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:15+5:302021-02-09T04:42:15+5:30
साताऱ्यातील पोवई नाका परिसरात असलेल्या मराठी युनिअन स्कूलच्या परिसरातील झाडाला फुले उमलली आहेत. ही फुले पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमी भेट देत ...

निरीक्षण फुलांतील बदलाचे..!
साताऱ्यातील पोवई नाका परिसरात असलेल्या मराठी युनिअन स्कूलच्या परिसरातील झाडाला फुले उमलली आहेत. ही फुले पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमी भेट देत असतात. त्यातील काहीजण दुर्बिनीच्या साह्याने त्यातील बदल टिपत असतात. (छाया : जावेद खान)
०००००००
विनामास्क वावर
रहिमतपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी धोका कमी झालेला नाही, त्यामुळे गर्दीत जाणे टाळा, मास्क लावा व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक लोक मास्कचा वापर न करता बाजारपेठेतून वावरत आहेत.
००००००
पाणपोईची गरज
दहीवडी : माण तालुक्यात मार्चपासून पाणीटंचाई जाणवते. ग्रामीण भागातून नागरिक दररोज मोठ्या संख्येने दहीवडीत येतात. त्यामुळे या शहरांमध्ये सामाजिक संघटनांकडून पाणपोई सुरू केली जाते. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा सामाजिक संघटना पुढे येण्यास तयारच आहेत.
००००००
हातपंप धूळखात पडून
सातारा : जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. त्यावेळी हातपंप उपयोगी पडतात. मात्र, अनेक ठिकाणचे हातपंप गंजले असून, ते धूळखात पडून आहेत. हातपंपांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
००००
फांद्या छाटल्या
सातारा : सातारा शहरातील अनेक भागांत वसाहती उभारण्याचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या विनापरवाना छाटल्या जात आहेत. काेणाला काही कळण्याच्या आतच फांद्या गायब केल्या जातात. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
००००००
श्वानांमुळे दहशत
पेट्री : सातारा तालुक्यातील काही भागात श्वानांची टोळकी मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. त्यांच्याकडून माणसांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
००००००
महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याची गरज
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश भागात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. मात्र अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीचा अंदाज न आल्याने अपघातांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
००००००
ग्रेड सेपरेटरमध्ये बर्हिवक्र आरसा...!
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमध्ये कोल्हापूरकडून येणारी वाहने अन् पालिकेकडून बसस्थानकाकडे जाणारी वाहने एकत्र मिळतात. त्या ठिकाणी अपघातांचा धोका असल्याने बर्हिवक्र आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर दिशेकडून येणारी वाहने नजरेस पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच सोय होत आहे. (छाया : जावेद खान)