आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 22:19 IST2016-05-27T21:42:05+5:302016-05-27T22:19:57+5:30

पोलिस महानिरीक्षकांचे आदेश : अपघातातील गाड्या पंचनाम्यानंतर थेट मालकांकडे

Now there will be no trains in Thane! | आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

सातारा : जिल्हा कार्यक्षेत्रात होणारे अपघात यांच्यासह पोलिसांनी कारवाई केलेली वाहने पंचनामा आणि आरटीओ तपासणी झाल्यानंतर आता थेट मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस कार्यरत झाले आहेत. या आदेशामुळे पोलिस ठाणे आवारात धूळखात पडलेल्या गाड्यांची संख्या आता कमी होईल.जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि मालकांनी दावा न केलेल्या तब्बल ६०६ वाहनांवर दोन वर्षांत कोणीच हक्क सांगायला आले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पोलिस ठाणे परिसरात शेकडो गाड्या आवारात धूळखात पडून आहेत. ही वाहने बेवारसस्थितीत असल्यामुळे अनेकदा त्यांचे सुटे भाग चोरीला जाणे, यासारखे प्रकार घडतात.
याविषयी ‘लोकमत’ ने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक यांनी याविषयीचे लेखी आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे अपघातातील गाडी पंचनामा झाल्यानंतर तातडीने मालकांच्या स्वाधीन करण्यात यावी, असे सूचित केले आहे.
याविषयी सर्वोच्च न्यायालयाने चलसंपत्ती पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर व्हावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच सातारा पोलिसांनी याविषयी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील २९ पोलिस ठाणे परिसरात बेवारस स्थितीत एकूण ५६७ दुचाकी वाहने, तीनचाकी ४ तर चारचाकी ३५ वाहने व त्यांचे सांगाडे पडून आहेत.
या वाहनांच्या मालकांविषयी वेळोवेळी आवाहन करूनही पोलिसांना वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीच दावा केला नाही. त्यामुळे ही वाहने अद्यापही बेवारसस्थितीत पोलिस ठाणे आवारात पडून आहेत.
यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने या वाहनांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आवाहन करूनही जर मालकांनी या गाड्यांवर दावा सांगितला नाही तर लिलावपद्धतीने या गाड्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

वाहन ही देशाची चलसंपत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही चलसंपत्ती गंजत पडणं म्हणजे राष्ट्रीय नुकसान आहे. पोलिस कायद्यातील कलम ८५ व ८७ यांचा वापर करून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील वाहने मूळ मालकापर्यंत पोहोचावीत व या यंत्रसामुग्रीचा योग्य वापर व्हावा, यासाठी लवकरच पुढील कारवाई सुरू होईल.
- अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, सातारा

Web Title: Now there will be no trains in Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.