हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !
By Admin | Updated: June 23, 2016 01:02 IST2016-06-23T00:28:48+5:302016-06-23T01:02:05+5:30
ग्रामस्थ सज्ज : ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेअंतर्गत गावाचा कायापालट करण्याचा ध्यास

हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !
खंडाळा : जलसंधारण, पाणलोट विकास, वृक्षारोपण वनसंवर्धन, नाला बांध, ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन यासह विविध उपक्रम हाती घेऊन गावाचा कायापालट करण्याचा ध्यास हरळी (ता. खंडाळा) येथील तरुणाईसह ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पासह हरळीत दुसरे हिवरे बाजार साकारण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरळीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी मशालफेरी काढून गावात होणाऱ्या बदलात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. त्यानुसार पुढील तीन दिवस गावच्या प्रमुखांसह तरुण वर्ग या कामासाठी पुढे सरसावला.
या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामविकास आराखडा, गाव सूक्ष्म नियोजन, गावच्या शिवारासह नकाशा तयार करण्यात आला आहे. चर्चासत्रे आणि लक्ष्य गट चर्चेतून गावात करावयाचा बदल कसा साकारता येईल, याचा आराखडा बांधण्यात आला. यासाठी या योजनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली.
गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिक्षण, गावातील प्रमुख रस्ते, स्वच्छता, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सांडपाणी निचरा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्यासाठी कृतिसत्र घेण्यात आले. गावच्या शिवारातील पाणी गावातच अडविण्यासाठी लोकसहभागातून दोन बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातही पाणी साठवणीसाठी योजना सुरू केली जात आहे.
हरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगर उतारावर आडवे चर घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम तरुणांनी हाती घेतली आहे. बीजारोपण आणि रोपलागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळणार
आहे.
या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दीपा बापट, विस्ताराधिकारी पवेकर, वनक्षेत्र अधिकारी शिंदे, सरपंच अवंतिका जावळे, उपसरपंच विजय शिंदे, नंदा निकम, कृष्णा बरकडे, अर्चना शिंदे, पूनम बरकडे, आबासो बरकडे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, संतोष बरकडे, कांतिलाल निकम, राहुल निकम, मोहन जावळे, चंद्रकांत शेलार, वसंत शेलार, संदीप ननावरे, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गावाभोवती जैविक कुंपण
या कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ग्रामस्थांनी शिवारफेरी केली. यामध्ये गावच्या शिवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचा अभ्यास करण्यात आला. गावातील शेतीला वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपलब्ध वनस्पतींचाच वापर करून जैविक कुंपण करण्याची योजना आहे. याशिवाय याच वनराईत उपलब्ध फळांपासून प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
हरळी हे गाव छोटीशी लोकवस्ती असणारे आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा गावाला होण्यासाठी काही कामे होणे गरजेचे आहे. तरुणांच्या सहभागातून हे सहजशक्य आहे. गावच्या विकासाला याची मदतच होईल.
-विजय शिंदे,
उपसरपंच हरळी