पवनचक्की फसवणुकीचा आता हिशेब!
By Admin | Updated: July 19, 2015 23:37 IST2015-07-19T22:43:01+5:302015-07-19T23:37:44+5:30
पाटण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक; मोरणा परिसरात राजकीय वातावरण तापले

पवनचक्की फसवणुकीचा आता हिशेब!
अरूण पवार-पाटण -तालुक्यातील मोरणा पठारावर गेल्या पाच वर्षांत पवनचक्की प्रकल्पांमुळे झालेली प्रचंड उलाढाल आणि ग्रामस्थांवर आलेले कठीण प्रसंग, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार, यामुळे मेटाकुटीस आलेल्या स्थानिकांना आता ग्रामपंचायत निवडणुकांद्धारे पुढाऱ्यांना योग्य वळणावर आणण्याची संधी साधून आली आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या पट्ट्यातील तब्बल १५ ग्रामपंचायत निवडणुकांतून असे चित्र निर्माण होणार आहे. दरम्यान, येथील राजकीय वातावरण तापले आहे.
पाटण पाटण तालुक्याचा मोरणा परिसर हा आमदार शंभूराज देसाई यांचा बालेकिल्ला आहे. कारण या विभागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि १५ ग्रामपंचायतींवर देसाई गटाचे वर्चस्व आहे. तरीही माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या ताब्यात या विभागातील आंब्रग, नाटोशी, माणगाव, मोरगिरी, गुंजाळी अशा ग्रामपंचायती आहेत. येत्या ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी मोरणा पठारावरील कोकिसरे, धावडे, पाचगणी, आटोली, गोकुळ तर्फ पाटण, पेठशिवापूर, आंबेघर तर्फ मरळी, माणगाव, आडदेव, वाडी कोतावडे, नेरळे, किल्ले मोरगिरी, पाळशी, झाकडे या
ग्रामपंचायती सज्ज झाल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत पवनचक्की प्रकल्पाने बस्तान बसवले असून, येथील शेतकऱ्यांना या प्रकल्पापायी तुरुंगाची हवादेखील खावी लागली आहे.
अनेकांच्या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण करण्यात आले. लाखोंचे बोगस चेक देऊन शेतकऱ्यांना फसविले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी विश्वासात न घेता पवनचक्की कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन टाकले. पुढाऱ्यांनी पवनचक्की व्यवस्थापनाच्या आमिषाला बळी पडून लाखोंची माया गोळा केली. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याचा हिशोब चुकता करण्यासाठी राजकीय गट-तट न विचारात घेता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावातील तरुणांनी वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. सत्ताधारी म्हणून आमदार शंभूराज देसाई हे अजूनही मोरणा विभागातील पवनचक्की प्रकल्प अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झालेले नाहीत, तर विरोधक या नात्याने माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर सक्षम विरोधकांची भूमिका निभावताना दिसत नाहीत.
नेत्यांचे मोरणा परिसरावर लक्ष
सध्या आमदार शंभूराज देसाई व त्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची पकड मोरणा विभागावर आहे. त्या तुलनेत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे सत्तास्थाने नाहीत. अनेक वर्षे मोरणा विभागात असलेले खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपददेखील या वेळेस काढून घेण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वत: नेत्यांनाच मोरणा विभागात लक्ष घालावे लागले आहे.
ये रे माझ्या मागल्या...
मोरणा विभागात जवळपास अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्यामुळे परिवर्तन करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, प्रत्येक गावात राजकीय गटांचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या दबावाखाली पॅनेलची निवड होते. त्यातून निवडून आलेल्यांना त्यांच्या विचारानुसारच कारभार करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे चालत राहतो.