वाकलेल्या खांबाजागी नवा खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:42+5:302021-02-06T05:15:42+5:30
साताऱ्यातील सदर बझार येथील वीज वितरण कंपनीचा खांब वाकल्याने धोकादायक बनला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये छायाचित्र प्रसिद्ध होताच गुरुवारी वीज ...

वाकलेल्या खांबाजागी नवा खांब
साताऱ्यातील सदर बझार येथील वीज वितरण कंपनीचा खांब वाकल्याने धोकादायक बनला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये छायाचित्र प्रसिद्ध होताच गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी नवीन खांब बसविला. (छाया : जावेद खान) ०३जावेद०५
००००००००००
झाडांवर खिळे
फलटण : फलटण तालुक्यातील अनेक मार्गावर रस्त्याच्या कडेच्या झाडांवर जाहिरात चिटकवण्यासाठी खिळे ठोकले जात आहेत. त्यामुळे अनेक झाडांना खिळ्यांनी अधू केले आहे. यामुळे झाडांचे आयुष्यमान कमी होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
०००००००
भुयारी मार्ग बंद
भुईंज : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत. त्यातून महामार्ग ओलांडण्यासाठी दुचाकीस्वार तसेच पादचारी वापर करत असतात. मात्र काही ठिकाणी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. तर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने हे मार्ग वापरणे धोक्याचे बनत आहे.
०००००००
गॉगल मागणीत वाढ
सातारा : जिल्ह्यात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत वाहने चालविणे अवघड जात असते. त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट किंवा गॉगलचा वापर करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीचा विचार करून साताऱ्यात ठिकठिकाणी गॉगल विक्रीसाठी आले आहेत. त्यांच्या मागणीत वाढ होत आहे.
००००००
पादचाऱ्यांमुळे धोका
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्ता दुभाजक असून पादचाऱ्यांसाठी भुयारी रस्ते आहेत. तरीही अनेक पादचारी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडत असतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
००००००
कचरा ओढ्यात
सातारा : साताऱ्यातील ओढ्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून संरक्षक जाळी बसविली आहे. तरीही असंख्य सातारकर या जाळीच्या वरुन कचरा ओढ्यात टाकत असतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
०००००
शहर वाहतूक एसटी वाढविण्याची मागणी
सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ झाली आहे. शहराचा विस्तार वाढत आहे. नागरिकांना एका टोकावरुन दुसरीकडे वारंवार जावे लागते. त्यामुळे रिक्षाचा वापर केल्यास अडवणूक केली जाते. याचा विचार करुन राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या विविध उपनगरांमध्ये सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
००००
बॅरिकेड धोकादायक
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता दुभाजकात लोखंडी बॅरिकेड लावून अडथळे उभे केले आहेत. त्यातील अनेक बॅरिकेड हलले असून ते रस्त्यावर आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाकडून पोवईनाक्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हे बॅरिकेड धोक्याचे ठरू शकते.
००००
वाळू रस्त्यावर
सातारा : साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हा परिषद या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाळू पडलेली आहे. ही वाळू अनेक दिवसांपासून उचलण्यात आलेली नाही. सुसाट दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वाळू हटविण्याची गरज आहे.
००००००
गॅस दरवाढीने त्रस्त (०५गॅस)
शिरवळ : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एक-एक रोजगार गेले आहेत. अनेकांचे पगार कमी झालेले आहेत. अशातच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गॅस दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
०००००००
चंदन क्षीरसागरचे यश
सातारा : सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत चंदन क्षीरसागर यांनी यश मिळविले. या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. निवृत्त सहायक विक्रीकर आयुक्त विनायक आगाशे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
००००००
स्मृतिदिन साजरा
सातारा : येथील कामाठीपुरा येथे अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अभयसिंहराजे भोसले ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रमेश वरगटे यांनी पुष्पहार अर्पण करुन भावना व्यक्त केल्या.
०००००००
मोबाईलवर आलेल्या दंडाने दुचाकीस्वार त्रस्त
सातारा : साताऱ्यातील चौकाचौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावत असतात. अशावेळी अनेक वाहने अडविली जातात. चालकांकडे विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते. मात्र काही चूक असल्यास चालकांशी चर्चा केली जात नाही. संबंधित दुचाकीस्वार निघून गेल्यानंतर पाठीमागून फोटो काढून दंडाचा मेसेज मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे दुचाकीस्वारांना काय करायचे हे समजेना झाले आहे.
००००००
गाड्या पेटू लागल्या
सातारा : सातारा जिल्ह्यातून राज्य, राष्ट्रीय तसेच आशियाई महामार्ग गेले आहेत. या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र वातावरणात बदल होऊ लागला असल्याने कारसारखी वाहने पेट घेत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
०००००
रास्ता रोकोचा इशारा
कोरेगाव : भाडळे-कोरेगाव मार्गावर धावणाऱ्या गाड्या कुमठे स्थानकात थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन एसटी थांबविण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
०००००००००
कोरोना जागृतीसाठी पाचगणीत पथनाट्य
पाचगणी : सातारा येथील युथ थिएटर कला शैक्षणिक व सामाजिक संस्था व पाचगणी पालिकेतर्फे पाचगणीत कोरोना जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. ‘हम है कोरोना के जमाने के जेलर’ या पथनाट्यातून या कलाकारांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. आठवडे बाजार असल्याने या पथनाट्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अमित परिहार, किरण पवार, पार्थ वंजारी, अनिश कांबळे, हणमंत शिंदे उपस्थित होते.