उदयनराजेंपुढे राष्ट्रवादीचे लोटांगण
By Admin | Updated: September 22, 2014 00:48 IST2014-09-22T00:45:48+5:302014-09-22T00:48:08+5:30
दबावतंत्र ठरले यशस्वी : राजे गटाला मिळाले उपाध्यक्षपद

उदयनराजेंपुढे राष्ट्रवादीचे लोटांगण
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर टाकलेले दबावतंत्र अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले आणि राष्ट्रवादीला एक पाऊल मागे यावे लागले. उदयनराजेंच्या दबावतंत्रात राष्ट्रवादी पुरती घायाळ झाल्यामुळे उपाध्यक्षपद रवी साळुंखे यांना द्यावे लागले. लोकसभा निवडणुकीतील दबावतंत्रानंतर जिल्हा परिषदेतही त्यांचे दबावतंत्र यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नव्हता.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी रविवारी झाल्या. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी उदयनराजे समर्थकांची जलमंदिरमध्ये बैठक झाली आणि पदाधिकारी निवडीत सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीतही उदयनराजेंनी हाच सूर कायम ठेवत आपली मागणी पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तसेच उपस्थित आमदारांच्यापुढे ठेवली. त्यांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढेही पेच निर्माण झाला आणि निवडीचा निर्णय रविवारीच होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील अनुभव आणि राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी उदयनराजेंनी अनुभवल्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे मंत्री शिंदे आणि रामराजेंपुढे जाहीर केले होते.
रविवारी दुपारी बारा वाजता नावे जाहीर करण्याचा निर्णय झाला आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते राष्ट्रवादी भवनात जमले. रामराजे नाईक-निंबाळकर येण्यापूर्वीच मंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादंी भवनात नावांची घोषणा केली. अध्यक्षपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्ष म्हणून रवी साळुंखे यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान, या निवडी एक वर्षासाठी असल्याचेही शिंदे सांगण्यास विसरले नाहीत.
हवे होते सभापतिपद... मिळाले उपाध्यक्षपद
उदयनराजे यांना स्वत: आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची अपेक्षाच नव्हती. त्यांना फक्त समाजकल्याण अथवा शिक्षण समिती सभापतिपद हवे होते. परिणामी उदयनराजे गटाकडून उपाध्यक्ष नाही केले तरी शिक्षण समिती सभापतिपद तरी मिळायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी रवी साळुंखे यांचे नाव पुढे करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र,आपण उपाध्यक्षपदावर ठाम राहिलो, तरच आपल्याला सभापतिपद मिळेल, अशी सुप्त भूमिकाही होती. त्यातच राष्ट्रवादीने सर्वच पदांची वाटणी सव्वा-सव्वा वर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यामुळे उदयनराजेंची बाजू आणखी भक्कम झाली आणि त्यांनी दबावतंत्र आणखी वाढविले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जाळे टाकले आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यात अलगद सापडले. परिणामी उदयनराजेंचे दबावतंत्र यशस्वी ठरले आणि सभापतिपदाऐवजी थेट उपाध्यक्षपदाची माळच रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. (प्रतिनिधी)