भाजपात गेलेल्यांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद
By Admin | Updated: August 20, 2016 00:26 IST2016-08-19T23:30:32+5:302016-08-20T00:26:14+5:30
अजित पवार : पलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपवरही निशाणा; कार्यकर्त्यांचा उत्साह

भाजपात गेलेल्यांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद
पलूस : आपण केलेल्या चुकीच्या कामाचे पितळ उघडे पडेल, या भीतीने भाजपमध्ये गेलेल्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार नाहीत, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी दिला. भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा जवळही करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. येथे आयोजित पलूस-कडेगाव तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील होते. यावेळी आमदार श्रीमती सुमनताई पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अण्णा डांगे, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, किरण लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, नोकरदार हवालदिल झाले आहेत. अच्छे दिन आणण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. महागाई, शेती, वीज, बेरोजगारी, उद्योग, व्यापार, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्या कामाला जनताच कंटाळली आहे. सरकार शेतकऱ्यांविषयी कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. मार्केट कमिट्या बंद पाडल्या. दहशत माजली असून, सरकार लक्ष देत नाही. मागेल त्याला शेततळे, ही योजना फोल ठरली आहे. विरोधात असताना वाघासारखे वागणारे शिवसेनेचे नेते शिवसैनिक आता बकरीसारखे वागत आहेत. पंतप्रधान मोदी यांची हिटलरशाही जास्त दिवस चालणार नाही.
ते म्हणाले की, आम्ही पंधरा वर्षात भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र आज चिक्की वाटप, विविध संस्था, आदिवासी मुलांना वस्तू वाटप यात भ्रष्टाचार करणारे मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत. एकनाथ खडसे यांच्याकडून बारा खाती का काढून घेतली, याचे भाजपकडे उत्तर नाही. इतरांना बदनाम करण्यापलीकडे भाजपच्या नेत्यांना काहीही येत नाही.
साखर कारखानदारी अडचणीत असताना त्यांना मदत करणे दूरच, मात्र, विक्री केलेल्या साखरेवर भरमसाट कर लागू केला जात आहे. सध्या दुधाचे दर कमी झाले आहेत. महागाईने कळस गाठला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्जाची घोषणा गेली कुठे? प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख ठेवण्याचे आमिष दाखवून केंद्राने लोकांना बँकेत खाती उघडण्यास भाग पाडले. पण या खात्यांवर दमडीही जमा झाली नाही. ही घोर फसवणूक असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला.
आ. जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी सुरू असून, विजेचे दर वाढत आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष सरकारकडून केला जात आहे. ताकारी, टेंभूसारख्या योजना पुन्हा सुरू करण्याची धमक सरकारमध्ये नाही.
अरूण लाड म्हणाले की, जी. डी. बापू लाड यांनी आदर्श तत्त्वानुसार साखर कारखाना आणि संस्थांचे काम सुरू आहे. पलूस, कडेगाव तालुका राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोण कुठे गेले हे पाहण्यापेक्षा पक्षवाढीला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सहकार्य करावे.
मेळाव्याप्रसंगी विश्वासराव पाटील, नंदाताई पाटील, वैशाली मोहिते, उषाताई दशवंत, पी. एस. माळी, अण्णा सिसाळ, आनंदराव निकम, वसंतराव लाड, तानाजी पाटील, जे. पी. पाटील उपस्थित होते. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर पोपट संकपाळ यांनी आभार मानले. सर्जेराव खरात, दिगंबर पाटील, स्नेहल पाटील, दिलीप पाटील, इलियास नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)
सदाभाऊ, राजू शेट्टींना टोला
अजित पवार यांनी, राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. जे लोक पक्षातून गेले, ते त्यांच्या भानगडी उघड्या पडू नयेत यासाठी सत्तेच्या वळचणीला गेले, अशी टिपणी त्यांनी केली. बाजार समित्यांच्या बंद आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेने कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजीपाला विकला, याबाबत बोलताना, एक दिवस मंत्र्यांनी भाजीपाला विकून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
सिंचन योजना : बनवाबनवी थांबवा
अजित पवार म्हणाले की, भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा दुस्वास केला जात आहे. सिंचन योजना बंद पाडल्या जात आहेत. सिंचन योजनांचे पंप सौरऊर्जेवर कसे काय चालवणार आहेत? मुख्यमंत्री असे आश्वासन देतातच कसे? ही बनवाबनवी थांबवा. आम्ही सत्तेवर असताना सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणावर करत होतो. त्यामुळे आताही आम्ही सांगितलेली सार्वजनिक कामे होतात.